शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

'माणूस', ‘माणुसकी’ व ‘पुरोगामीं’चे ‘वैश्विक संस्कार’!

  

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

          मॉब, थवा, कळप यांचं मानसशास्त्र काय असतं? कळपातल्या भाबड्या लोकांचं सरासरी वय काय असतं? केवळ या प्रश्नांनाच अनुसरून नाही तर आजची परिस्थिती कोणत्याही कळपाहून दिवसेंदिवस भयानक होत आहे. म्हणून भलतीकडे संमोहित होऊ पाहणाऱ्यांच्या पायरीवर उतरावं लागत असल्यानं, हे प्रबोधन आजच्या काळात काही प्रगल्भ लोकांसाठी ‘बाळबोध’ ठरणार असलं तरी ते करावं लागणार आहे :  

          कारगिल युध्दाच्या आसपासच्या काळातली गोष्ट असावी. गोष्ट नव्हे, वास्तव घटना. एक हिंदू जोडपं काश्मीरचा प्रवास करत होतं. गाडी चालवताना पुरूष बायकोला म्हणाला, कपाळावरची टिकली काढून ठेव. कुटुंबाच्या मनात जी भिती होती तेच पुढं घडलं. रस्त्यात त्यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अडवलं. पैकी एकानं विचारलं, हिंदू हो या मुसलमान?’ त्या पुरूषानं क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, मुसलमान. दहशतवादी म्हणाला, तो कुराण के कुछ आयत सुनवाईए. पुरूषानं प्रसंगावधान सांभाळत पाठ असलेले भगवद्‍गीतेचे काही श्लोक अडखळत म्हटले. ते ऐकून दहशवाद्यांनी त्यांना पुढं जाऊ दिलं.  

          दहशतवाद्यांना बरंच मागं टाकल्यावर त्याच्या बायकोनं विचारलं, कुराणातले म्हणून तुम्ही भगवद्‍गीतेतले श्लोक म्हटलेत. त्या आतंकींच्या हे लक्षात आलं असतं तर?’

          पुरूष सहज बोलून गेला, ह्या लोकांनी कुराण वाचलं असतं, तर ते अतिरेकी झालेच नसते!

          या उद्‍गारातून तात्कालिक प्रसंगात हा माणूस त्याच्याही नकळत किती मोठं तत्वज्ञान सांगून गेला!   

          अजून एक घटना. ओशोंनी (आचार्य रजनीश) त्यांच्या व्याखानात सांगितलेली. ओशोंना एकदा त्यांचा मित्र म्हणाला, माझी आई खूप धार्मिक आहे. त्यामुळं ती बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. पण वृध्दत्वामुळं ती भेटायला येऊ शकत नाही. हे ऐकून ओशो स्वत: मित्राच्या घरी जाऊन आईला भेटले. गप्पांच्या ओघात आई म्हणाली, सध्या काय वाचताहात?’ ओशो मुद्दाम म्हणाले, ‘‘कालच बायबल वाचून संपवलं, आज कुराण वाचायला घेणार आहे!’’ हे ऐकून आई आश्चर्यानं म्हणाली, अरे, तुम्ही हिंदू असूनही दुसऱ्या धर्माचे ग्रंथ वाचता?’ ओशो फक्त स्मित करत न बोलता जायला निघाले. घराबाहेर सोडायला मित्रही आला. परतताना ओशो मित्राला म्हणाले, मला वाटलं आई खरंच धार्मिक असेल, पण त्या धार्मिक नसून संप्रदायिक आहेत! म्हणजे आप-पर मानणारी आहे. इतर धर्मांकडं दुषित दृष्टीनं पाहणारी आहे.  

               कोणत्याही धर्मातला खरा धार्मिक, अध्यात्मिक, धर्म-अभ्यासक परधर्माचा व्देष करत नाही. ज्यांनी आपल्या धर्मग्रंथांचा काळजीपूर्वक अभ्यास केला असेल त्यांच्या मनात इतर धर्मांचाही आदर असतो. कोणाचंही धार्मिक असणं इतरांसाठी दहशती वा विशिष्ट लोभासाठी नसेल तर ते लोकांना न आवडायचं काहीही कारण नाही! पण धर्मातले अर्धवट लोक स्वार्थासाठी अतिरेक्यांची भरती करतात. धर्माच्या वरवरच्या रंगात उन्माद भरतात. धर्मसत्ता म्हणजेच राजसत्ता समजणारे धर्मांध होतात आणि बाह्यरूपात धर्माच्या पेहरावातून दैवतांच्या खुणा वापरत आपला धंदा सुरू ठेवतात! जे लोक धर्माच्या आडून सत्ताकारण करतात त्यांचा जनकल्याण हा हेतू कायम संशयास्पद ठरतो!

          खऱ्या धार्मिकतेच्या कसोटीसाठी अगदी सोप्या शब्दांत एक सिध्दान्त मांडता येईल : कोणत्याही धर्मांत तीन पातळ्यांवरचे लोक गृहीत धरले तर- १) धर्माचा खोलवर अभ्यास करून आतूनच अध्यात्मिक असलेले लोक. (उदाहरणार्थ, हिंदू परंपरेतील संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा, विवेकानंद, महात्मा गांधी इ.) २) धर्म वाचवण्याचा ठेका आपणच घेतला आहे अशा अविर्भावानं पण विशिष्ट स्वार्थासाठी धर्माचा चातुर्यानं उपयोग करून बहुजन समाजाला धर्मवेडं बनवण्याचा प्रयत्न करणारे धर्माचे दलाल. (उदा. परधर्माविरूध्द चिथावणी देणारे लोक, धर्मात आर्थिक- राजकीय सत्ता संबंध गुंतलेले लोक, बाबा- बुवा इ.) ३) क्रमांक २ वर असलेल्या दांभिक लोकांच्या नादी लागून आपली स्वत:ची बुध्दी गहान ठेवत, समाजाभिमुख नव्हे, तर सकाम-समूल्य मोबदल्यात समाजात बांडगुळी गुंडगिरी करणारे उन्मादी लोक. (उदा. सर्वसामान्यातले वाट चुकलेले लोक.) असे ‍दिसतील.            

          यात वर सांगितलेल्या १ क्रमांकाच्या अध्यात्मिक लोकांच्या नादी लागलेल्यांकडून अन्य कोणाचं नुकसान होत नाही, उलट त्यांची स्वसमाधानी आत्मोन्नती होऊ शकते. पण २ व ३ पासून सावधान! अभ्यासातून- चिंतनातून धर्मात काय चांगलं वा वांगलं ते आपणच शोधून योग्य ते आचरण करणं केव्हाही योग्य. वरील मांडणी पाहता स्वधर्माचा- तत्वाचा ठेका अन्य कोणाला कोणी का द्यावा?  

          हिंदू लोकसंस्कृतीत संशोधन करून याआधीच सुधारीत विचारांनी भगवान महावीर, गुरू नानक, गौतम बुध्द यांनी स्वतंत्र धर्मांची नव्यानं स्थापना केली, तर काही संतांनी धर्मांतर्गत विविध पंथांची स्थापना केली, हे सर्वज्ञात! (यात नास्तिकांच्या चार्वाक ह्या पंथाचाही समावेश.) भक्तीचे मार्ग अनेक आणि वेगवेगळे असू शकतात, आहेत. यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी, शाहू, राजाराम मोहन रॉय, विवेकानंद, संत तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी, महात्मा फुले, गो. ग. आगरकर, धोंडो केशव कर्वे आदींनी धर्मातल्या अनेक वाईट व घातक परंपरांना  त्या काळी तिलांजली दिली! नाहीतर आजही महिला सती जात राहिल्या असत्या, अज्ञानामुळं चूल आणि मूल यातच खितपत पडल्या असत्या, मुलींची लग्न पाळण्यात होत राहिली असती. वर्तमानात काय योग्य वा अयोग्य याचा सारासार- साधकबाधक विवेक करून (कोणत्याही) धर्मातल्या वाईट गोष्टींना राम राम करायचा की डोळे बंद करून भजत सांभाळायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं. राज्यघटनेतील भाषण- लिखाण- अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आज लोकांसोबत आहे. गुंडगिरी- दहशतीविरुध्द अहिंसक निर्भय वैचारिक लढाईसाठी ही किती आश्वासक गोष्ट आहे!...  

          वाट चुकलेल्या प्रचार मोहीमेत शिक्षकही आज मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले दिसतात. कोणताही शिक्षक हा पेशानं हाडाचा शिक्षक समजला जातो. (फक्त व्यवसायानं नव्हे.) शिक्षकानं विद्यार्थ्यांना प्रथम 'माणूस' म्हणून घडवत माणुसकीच शिकवली पाहिजे. शिक्षक एकांगी- संकुचित विचार करणारा कसा असू शकेल? विषय कोणताही असो, शिक्षक हे पुरोगामीपणाचं मुर्तिमंत उदाहरण ठरलं पाहिजे! म्हणून तो फॅसिझमचा पुरस्कार कधीच करू शकत नाही! तसं करत असेल तर त्याला शिक्षकाच्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

(उत्तर प्रदेशातील तृप्ती त्यागी नावाची एक शिक्षिका अल्पवयीन मुलांना धार्मिक व्देष शिकवते, तर दिल्लीतली अजून एक शिक्षिका देशातल्या नागरिकांची वर्गवारी करते. ही ताजी उदाहरणं म्हणजे आपला प्रवास नक्की कोणत्या दिशेनं सुरू आहे याची झलक समजावी.)

          नव्या विचारांसाठी जिथं आधीच मनाची- बौध्दीकतेची दारं आतून कडेकोट लावलेली असतात, तिथं मत परिवर्तन होणं पूर्णपणे बंद होतं. अलीकडे हे प्रमाण मनात भय निर्माण करण्याइतकं भयंकर वाढलेलं आहे. विशिष्ट लोकांनी विशिष्ट विचारधारेचा ब्रेन वॉश करून अनेकांना पूर्णपणे संमोहित केलेलं आढळेल. त्यांच्या विचारधारेच्या विरूध्द कोणी कितीही मोठा वास्तविक पुरावा सादर केला तरी ते त्यांच्या बाजूनं खोटा युक्तीवाद करत आकांडतांडव करत लढत राहतील, अथवा ओढूनताणून पटवून सांगण्यासाठी त्यांच्याकडे पुराणातली वांगी तरी असतील, अथवा त्यांचा प्रचार सपशेल उघडा पडला तर ते व्यक्तिगत दुश्मनासारखं तुमच्या अंगावर धाऊन येतील. मेंदूत फिट्ट बसलेली विचारधारा कोणी काढून घेतली तर त्यांना जगण्यासारखं आजूबाजूला काही दिसत नाही, हे जास्त भयानक आहे आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा लोकांवर आता मानसशास्त्रीय वैद्यकीय उपायांशिवाय दुसरा पर्याय नाही.     

          विशिष्ट विचारधारेचा ब्रेन वॉश होऊ द्यायचा की स्वतंत्रपणे विचार करायचा, कोणाच्या लादलेल्या विचारांनी गुलाम व्हायचं की योग्य मार्गदर्शनासाठी त्या विषयाचा अभ्यास करायचा, केवळ सांगीवांगी वा समाज माध्यमांतल्या प्रचाराच्या भरोशावर रहायचं की सारासार उपोद्‍बलक विवेक करायचा हे यापुढं ज्याच्या त्याच्या वकुबावर अवलंबून असणार. प्रत्यक्ष करण्यात नसली तरी वागण्यात आपल्यात सामाजिकता रूजायला हवी की नको? समाज माध्यमांवर फिरणाऱ्या बाबी खऱ्या की प्रचार हे समजण्यासाठी थोडातरी ऐतिहासिक सत्याचा वास्तव अभ्यास करत स्वत: सुज्ञ व्हायला हवं ना?

          समाज माध्यमांवर अलीकडे अचंबीत करणाऱ्या अनेक खोडकर घटना घडताहेत. कोणाचे विचार पटले नाहीत की समोरासमोर परिचय नसला तरी वा समोरच्याचे अन्य योगदान माहीत नसतानाही त्या व्यक्तीनं अमूकचा व्यक्तीगत गुन्हा केलेला असावा अशा पध्दतीनं धमक्या देत वेगळ्या नावांच्या फेक आयडींवरून ट्रोल केलं जातं. मानसिक संतुलन बिघडलेल्या वा अबनॉर्मल लोकांशी आपली गाठ आता रोज पडू लागली. इतरत्र ऐकू येणारा उन्माद आता आपल्या गावात, आपल्या घरादारापर्यंत येऊन पोचला. नागरिक जागरूक होत सावध राहिला तरच अशा कृत्यांना वेसण घालता येईल.

          नुकतीच घडलेली अजून एक घटना सगळ्यांनाच माहीत आहे. धावत्या रेल्वेत ड्युटीवर असलेल्या एका हत्यारबंद पोलिस कर्मचाऱ्यानं- सर्व्हीस बंदुक वापरून नुकतंच केलेलं हत्याकांड हे या विवेचनाचं ताजं उदाहरण. भावना पेटवणारे लोक केवळ सत्ता राखण्यासाठी भावना पेटवतात. ते सगळं खरं समजून एका संमोहित झालेल्या कर्मचाऱ्यानं पाच कुटुंबं क्षणार्धात नेस्तनाबूत केली. (स्वत:च्या कुटुंबासह). ज्यांनी कोणी या कर्मचाऱ्याच्या मेंदूत हा किडा सोडला ते मात्र नामानिराळं राहून सत्तेच्या उबेत मत्त आहेत. हा कर्मचारी एकमेव नाही, असे असंख्य लोक हे किडे चोवीस तास आपल्या मेंदूत घेऊन फिरताहेत. अशा बऱ्याच घटना आज आजूबाजूला घडू लागल्या आहेत.

          सारांश, आपण पुरोगामी आहोत का? जागतिक नागरिक आहोत का? आपल्यावर वैश्विक संस्कार आहेत का? या प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच आज आपण माणूस म्हणवून घ्यायला पात्र ठरू! नागरिकांत बंधुभाव जागृत करण्याचं जे काम सरकारनं आपल्या वागणुकीतून दाखवून द्यायला हवं, ते आज नागरिकांना करावं लागतं, हे दुर्दैवं!

                    (अप्रकाशित. इतरत्र वापर वा अग्रेषित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

पंतप्रधानांना पत्र

 

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

          माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आज दिनांक १ ऑगष्ट २०२३ रोजी ईमेलने पाठविलेले पत्र :

 

प्रति,

सन्माननीय नरेंद्र मोदीजी,

पंतप्रधान, भारत.

विषय : भारताच्या भवितव्यासाठी विनंती पत्र.

सर,

          आपण लोकशाही पध्दतीने निवडून येऊन पहिल्यांदा पंतप्रधान झालात त्यावेळी आपल्या अभिनंदनाचा मी ब्लॉग लिहिला होता. प्रत्येक भारतीय नागरिक आशेने, अभिमानाने आणि प्रेमाने आपल्या पंतप्रधानांकडे पहात असतो. इतर देशांत होणारा आपल्या पंतप्रधानांचा सन्मान, कोणताही नागरिक आपल्या देशाचा म्हणजेच स्वत:चा सन्मान समजतो. याच आपल्या सन्मानातून प्रेमाने तर काही घटनांमुळे व्यथीत होऊन, दर पाच वर्षांतून मतदान करणारा नागरिक या नात्याने आज आपल्याला हे पत्र ईमेलने पाठवीत आहे.

          काही वर्षांपूर्वी दूरचित्र वाहिन्यांवर आयसिस- इसिस (ISIS), तालीबानी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या – माणसं क्रूरपणे ठार मारण्याच्या - चित्रफिती पाहून अंगावर शहारे यायचे. या घटना दूरच्या देशांत घडत असूनही माणूस असल्याची लाज वाटायची. त्याच चित्रिकरणाच्या आज नवीन चित्रफिती पहात आहोत की काय असे वाटावे, अशा घटना आज आपल्या देशाच्या- भारताच्या काही प्रांतात (विशेषत: मणिपूर) वर्तमानात घडत आहेत. हिंदू धर्मासाठी ही (सशस्त्र) लढाई असेल तर अशी कृत्ये करणार्‍यांनी वरील नामोल्लेखातील दहशतवाद्यांच्या क्रूर गोटात धर्मांतरच केले आहे असे म्हणावे लागेल. मग आपण म्हणजे भारतीय लोक नक्की कोणत्या धर्माचा अभिमान बाळगत आहोत! भारतीय नागरिकांनी अशा दहशत माजवणार्‍या पाशवी लोकांकडून आपला धर्म शिकावा का!

          आज भारतीय नागरिकांत मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होत आहे, झालेले आहे. मनांची भावनिक फाळणी झाली आहे. विचारांनी लोक विभक्त झाले आहेत. हे गावागावातच नव्हे तर प्रत्येक कुटुंबातही झाले आहे. विरोधात कोणी ब्र काढला तर अश्लाघ्य- अशोभनीय उघड धमकी दिली जाते. अनेक व्यक्ती आणि अनेक संघटना देशात आपापसात व्देश पसरवताहेत, महापुरूषांचा अपमान करीत आहेत. असे यापूर्वी भारतात कधीही झालेले नव्हते.

          पंतप्रधानांवर काही लोक जीव ओवाळून टाकायला तयार आहेत तर काही लोकांना आपले पंतप्रधान परके वाटतात, असे का व्हावे. अगदी आणीबाणी काळातही भारताचे सर्वसामान्य नागरिक पंतप्रधानांचे टोकाचे भक्त वा टोकाचे मत्सरी झालेले नव्हते. तेव्हा विचारांची फूट पडलेली नव्हती. आज का व्हावे. आणीबाणीत इतर राजकीय पक्षांचे दमन केले गेले, नेत्यांना तुरूंगात डांबले गेले, परंतु सर्वसामान्य माणसाला (कामगार, मजूर, शेतकरी, महिला, आदिवासी आदींना) असुरक्षित वाटत नव्हते; महिलांवर दिवसाउजेडी सामुहिक लैंगिक अत्याचार होत नव्हते वा निघृणपणे ठार केले जात नव्हते. जवळपास तीन महिण्यांपासून (3 मे 2023) मणिपुरी महिलांवरील अत्याचाराच्या शेकडो घटना आपल्याला ज्ञात आहेतच. आज सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला हे का आले आहे! 

          आज देशासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या विषयांवर आपण बोलत नाहीत म्हणून उन्मादी, दहशती, सत्तांतर्गत भ्रष्ट, प्रतिमाभंजक, कर्जबुडवे आदी कृत्ये करणार्‍यांना वाटते की त्यांना आपली संमती आहे, तर इतरांना वाटते, पंतप्रधान अशा लोकांशी सहमत नसतील म्हणून ते काही बोलत नसावेत. पण आपली भूमिका नक्की काय आहे हे सर्वसामान्य लोकांना जाणून घ्यायचे आहे. तसा वेगळ्या भूमिकेचा प्रश्नच मुळी उद्‍भवत नाही. आपण पंतप्रधान असल्याने भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हित ते आपले हित आहे!  

          १९१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये आपण फक्त विकासावर बोलत होतात. धर्म त्यावेळी कुठेच नव्हता. आज विकासाच्या सत्ताकारणात हा धर्म केंद्र स्थानी कसा आला, ते कळत नाही. राजकारणात धर्म असलाच तर तो राजधर्म आहे! सन्माननीय अटलबिहारी वाजपेयी साहेबांनी त्यांच्या सत्ताकाळात राजधर्म पाळला होता व आपल्यासह अनेकांना तो पाळायला सांगितला होता.

          आजही कोणत्याही भाषणांत आपण भ्रष्टार्‍यांविरोधात बोलतात ते नागरिकांना आवडते. विधायक कामे करून विरोधकांना नामोहरम करणेही कोणालाही आवडेल. पण विरोधी पक्षातील केवळ भ्रष्टाचारी लोकांनाच आपलेसे करत आपल्या पक्षात घेऊन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री- मंत्री अशी पदे वाटत, पक्ष- सत्ता बळकट करण्याचे तंत्र नागरिकांच्या आकलनापलीकडे आहे. भ्रष्टाचारी असणार्‍यांची जागा तुरूंगात असली पाहिजे, ते मंत्रीपदांच्या खुर्चीत पहावे लागतात, यावर नागरिकांनी काय करावे. या भ्रष्टाचारी आयारामांना आपला सक्त विरोधच असेल हेही आपल्या भ्रष्टाचारविरोधी भाषणांतून लक्षात येते.

          अशा बर्‍याच गोष्टी आहेत सर. त्या आपल्यालाही ज्ञात आहेत. पण देशात यादवी होऊ नये म्हणून भारताच्या नागरिकांची बौध्दीक फाळणी व लैंगिक अत्याचारांसह हिंसा या गोष्टी आपण तात्काळ थांबवाव्यात, अशी भारताचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे. अशी हिंसा थांबवणे आपल्याला (म्हणजे पंतप्रधानांना) अवघड नाही. भारताच्या भवितव्यासाठी हे आवश्यक आहे.

          आपल्याला मराठी लिहिता बोलता येते हे माहीत असल्याने पत्र मुद्दाम मराठीत व आपल्याविषयीच्या आदरामुळे लिहीत आहे. धन्यवाद सर.

आपला विश्वासू,

डॉ. सुधीर राजाराम देवरे

(भारताचा सामान्य नागरिक व साहित्यिक)  

 © डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

शनिवार, १ जुलै, २०२३

गल‍िच्‍छ राजकारण आणि साहित्यिक

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

           सध्याचं राजकारण हे संवेदनशील मनाला भयानक व्यथीत करणारं आहे. उव्देगातून कितीही टाळलं तरी तत्कालीन घटना, प्रसंग, चिंतनातून काही प्रतिक्षिप्त क्रिया आपोआप आतून येत राहतात. या स्व-प्रतिक्रिया समविचारी मित्रांशी जोडाव्यात, समविचारी नसलेल्यांना दुसर्‍या बाजूची कल्पना देत वेगळ्या दिशेनं विचार करायला प्रवृत्त करावं, या विचारानं शब्दबध्द करून सोशल मीडियावर (जबाबदारीनं) पोस्ट केल्या जातात. हे कोणत्याही काळात नैसर्गिक तर आहेच पण आवश्यकही आहे. (देशाच्या व्यापक भल्यासाठी असलेल्या पोस्ट इथं अभिप्रेत आहेत. विकृत प्रतिक्रिया नाही.)

          राजकारणावर लिहिलेली माझी अशी एक पोस्ट वाचून एका वाचक- लेखक- मित्रानं पोस्टवर टिपणी लिहिली : आपल्यासारख्या साहित्यिकानं राजकारणासारख्या पोस्ट करणं मनाला पटत नाही सरजी! त्यापेक्षा मग पुर्णवेळ खुल्या मनानं अशा राजकारणात उतरून घाणेरड्या राजकारणाची स्वच्छता करण्याचं सर्व साहित्यिकांना आवाहन करा म्हणजे सगळे मिळून ते काम चांगल्या प्रकारे होईल. आपण म्हणता तसं घाणेरडं राजकारण जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र पोहचलेलं दिसतं.

          अशा प्रतिक्रिया वाचून अचंबीत होण्यापेक्षा यासाठी तयार रहावं, असा हा काळ आहे. या प्रतिक्रियेत महत्वाचा घटक साहित्यिक आल्यानं हा लेख लिहीत आहे. साहित्यिकांनी राजकारणापासून दूर रहावं म्हणजे काय? उलट सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जनजागृती करणं हे साहित्यिकांचं विशेष कर्तव्य आहे. (आ‍णीबाणीच्या काळात दुर्गा भागवतांसह अनेक साहित्यिक- विचारवंत तत्कालीन सत्तेविरूध्द स्पष्ट भूमिका घेत होते.) कष्टकरी नागरिकांना त्यांच्या व्यस्ततेमुळं राजकारणातलं सगळंच तात्काळ कळतं- पोहचतं असं नाही. म्हणून साहित्यिकांनी गलिच्छ राजकारणावर अगदी ठरवून प्रहार करायला हवेत. जनहितार्थ वेळोवेळी शक्य असेल तिथं प्रबोधन करायला हवं. उठसुठ चोवीस तास घाणेरडं राजकारण खेळणार्‍यांवर मुद्दाम बोललं पाहिजे. भूमिका घेतली पाहिजे. नुसतं काल्पनिक साहित्य लिहून गप्प बसलं म्हणजे कर्तव्य संपलं असं नव्हे. त्या त्या वेळी सामाजिक बांधीलकीसह योग्य अभिव्यक्तीतून भूमिका घेतली नाही तर साहित्यिकही संधीसाधूच ठरेल. वाचाळ- घाणेरडं राजकारण अनुभवून प्रत्येक साहित्यिकाच्या मनाला व्यक्तीगत हाणी झाल्यासारख्या आतून वेदना झाल्या पाहिजेत, इतकं आपल्या भोवती सगळं भयानक चाललं आहे!  

          राजकारण हे दूरून गंमत पहात करमणूक करून घ्यायचं साधन नाही. राजकारण म्हणजे व्यापक अर्थानं समाजकारणच असतं. समाजकारण करण्यासाठीच जनतेनं निवडून दिलेले लोक भौतिक सुधारणा, कायदे, लोकहित साधत असतात. जनकल्याणाच्या योजना आखतात. आपण निवडून दिलेले लोक समाजासाठी जे काम करतात ते राजकारण! अशा लोकांनी राजकारण लोकांच्या भल्यासाठी विधायक पध्दतीनं करायला हवं, अशी अपेक्षा असते. विघातक कामं करण्यासाठी लोक त्यांना निवडून देत नाहीत. आपसात कुरघोड्या करण्यासाठी नाही. रोज कोलांटउड्या मारण्यासाठी नाही. स्वत:ला विकण्यासाठी नाही. येता जाता पक्षांतर करण्यासाठी नाही. स्वार्थ दिसेल तिथं पळण्यासाठी नाही. टोले, कोपरखिळ्या मारण्यासाठी नाही. चिमटे काढण्यासाठी नाही. रिकामटेकड्या लोकांसारखी निंदानालस्ती करण्यासाठी नाही. हवेतल्याहवेत आरोप करण्यासाठी नाही. शिवराळ- अर्वाच्य बोलण्यासाठी नाही. जनहिताचा महामूर पैसा जाहिरातींवर खर्च करण्यासाठी नाही. हॉटेलींगवर खर्च करण्यासाठी नाही. विमानानं देशभर आणि विदेशात सहली काढण्यासाठी नाही. विशिष्ट श्रीमंत उद्योजकांना फायदा पोचवण्यासाठी नाही. (कर्जबुडव्यांना परदेशात पळवायला मदत करण्यासाठी नाही.) विधायक कामाच्या पैशांतून टक्केवारी घेण्यासाठी नाही. खोटी बिलं बनवण्यासाठी नाही. आमदार- खासदार विकत घेण्यासाठी नाही. सत्तेच्या बळानं येनकेन प्रकारे कायद्याच्या कचाट्यात ओढून विरोधकांचा काटा काढत कोणालाही ऊठसुट तुरूंगात डांबण्यासाठी नाही. सत्तेला गोचडीसारखं चिटकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला कोण कोण कसं कसं आडवं आलं हे रोज टीव्हीवर सांगण्यासाठी नाही. विशिष्टतेची लॉबींग करण्यासाठी नाही की नागरिकांची फाळणी करण्यासाठी नाही. रोज निवडणुकाच होत असल्यासारखं कायम पक्षीय प्रचारकी भाषणं करण्यासाठी नाही. येता जाता कशाचंही नामांतर करण्यासाठी नाही. (नावं बदलायलाही सरकारी तिजोरींवर ताण येतो.) वा जातीयवादी- धर्मवादी होऊन विशिष्ट समुदायाचा व्देश करण्यासाठी नाही. राजकारण हे बिनभांडवली धंदा करण्यासाठी नाही. (गावागावातल्या व्हॉटसअॅप ग्रुपवर चाललेल्या तूतू-मीमी सारखं वातावरण आज उच्चस्तरीय राजकारणात दिसून येतं. आणि चॅनल्सही या राजकारणासारखेच दिवसेंदिवस गुणवत्तेनं खालची पातळी गाठत आहेत.) दहा- बारा वर्षांपूर्वी सत्ताधार्‍यांवर ‍टीका केली तर आपल्या आजूबाजूच्या माणसांना राग येत नव्हता, आता संबंध बिघडण्याइतका राग येतो. (हे सगळं कशातून होत आहे?) लोकशाहीचे चारही स्तंभ त्या त्या जागी तटस्थ काम करताना दिसले पाहिजेत. मग सरकार कोणाचंही असो.

          जास्तीतजास्त लोकांच्या वास्तव मतांनी राजकारण्यांना लोकशाही पध्दतीनं लोकप्रतिनिधीपद प्राप्त झालेलं असतं. या पदावर त्यांची वरिष्ठांकडून नेमणूक झालेली नसते, पण स्वकतृत्वासह विशिष्ट पक्षाच्या नावानंही ते निवडून आलेले असतात. (म्हणून लोक‍प्रतिनिधी असताना पक्षांतर करणं हा मतदारांचा विश्वासघात ठरतो.) सार्वजनिक जीवनात जनतेत कोणताही भेदभाव करणार नाही’, अशी या लोकप्रतिनिधींनी भारतीय राज्यघटनेला स्मरून लोकशाहीच्या मंदिरात म्हणजे संसदेत- विधानसभेत शपथ घेतलेली असते.  

          राजकारणानं लोकजीवनाचा प्रत्येक कोपरा व्यापलेला आहे. जनतेची प्रत्येक अत्यावश्यक गोष्ट, निवडून आलेले व बहुमत असलेले राजकारणी- सत्ताधारी ठरवीत असतात. राजकारणाचा जनतेवर रोज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिकतेह सर्वांगीन असा प्रत्यक्ष परिणाम होत असतो. आपली जीवनशैली ठरवण्याचं अप्रत्यक्ष काम सामूहीक सत्ताकारण ठरवीत असतं. महागाई, स्वस्ताई, भ्रष्टाचार, रोजगार, बेरोजगार, विकास, वंशवाद, झुंडवाद, इतिहासाची छेडछाड, ज्ञान– अज्ञान प्रसार, अंधश्रध्दा प्रोत्साहन आदींना सरकार प्रत्यक्ष जबाबदार ठरतं. भारत हा शेतीप्रधान देश असल्यानं अर्थकारण शेतीकेंद्रित असायला हवं, पण अलीकडच्या धरसोड वृत्तीमुळं शेतीचं नुकसान होत आहे. (कोणाचं व्यक्तीमहात्म्य वाढवायचं आणि कोणाची प्रतिमा भंजन करायची हे सरकारवर अवलंबून असतं. प्रत्येक सरकारनं तत्कालीन आणि भवितव्याचा विचार करायचा असतो, अन्यथा भविष्यात कधीही भरून न निघणारं नुकसान होत राहतं.)    

          आपण राजकारणापासून कितीही कोस दूर राहण्याचा प्रयत्न केला तरी सत्ताधार्‍यांचे निर्णय थेट आपल्या घरात वास्तव्य करायला येतात. राजकारण्यांच्या- सत्ताधार्‍यांच्या निर्णयांचा थेट जनजीवनावर परिणाम होतो. अशा सर्वव्यापी राजकारणापासून नागरिकांतील विशिष्ट घटकाला दूर कसं राहता येईल? तटस्थ कसं राहता येईल? का रहावं? चुकीचे निर्णय आपण सहन का करावेत? आपण पावलोपावली भरत असलेल्या करानं सत्ताकारण होत असेल तर नागरिक अलिप्त कसा राहू शकतो? राजकारण हा इथल्या लोकांपासूनचा वेगळा प्रांत आहे का की, त्यापासून आपल्याला अलिप्त राहता येईल? की राजकारण हा विशिष्ट खेळ आहे म्हणून आपण ऐच्छिकतेनं त्यात सामील व्हायचं की नाही ते ठरवायचं? मला क्रिकेट आवडत नाही असं कोणी म्हणू शकतं. पण त्याच अर्थानं मला राजकारण आवडत नाही, म्हणून मी त्याकडं सपशेल दुर्लक्ष करीन’, असं कोणाला म्हणता यायला नको, इतक्या व्यापकपणे राजकारण हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आणि तरीही कोणीतरी आपल्याला शिकवतं की, आपण अमूक तमूक वा साहित्यिक असल्यानं राजकारणावर बोलू नये? 

          वाईट राजकारणावर मतभेद असलेल्या प्रत्येक मतदारानं म्हणजेच नागरिकानं मतप्रदर्शन करायला हवं. प्रत्येक साहित्यिकाला, विचारवंताला  राजकारणावर वचक ठेवावा लागेल. प्रत्यक्ष राजकारणात उतरणं आपल्याला शक्य नाही म्हणून आपण राजकारणावर बोलायचंच नाही? प्रत्येक जण राजकारणात उतरू शकत नाही पण चांगल्या विधायक राजकारणाची अपेक्षा करू शकतो. यासाठी नागरिकांचा वचक राजकारण्यांवर- सत्ताधार्‍यांवर असलाच पाहिजे. सत्ताधार्‍यांवर टीका करू नये, असं अप्रत्यक्षपणे कोणी सुचवू लागलं की समजावं आपली वाटचाल हुकुमशाहीकडं आहे. अथवा काल-परवा सहज व्यक्त होणारा समाजकार्यकर्ता- जागरूक नागरिक अबोल झाला की समजावं, लोकशाही धोक्यात येत आहे.               

लोकशाहीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सुजाण नागरिक यांचं पहिलं लक्ष्य हे सत्ताधारीच असतात, मग ते सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत. सत्ताधारी सत्ता राबवित असतात, निर्णय घेत असतात. त्यांच्या भल्या भुर्‍या निर्णयांचा जनतेवर तात्काळ परिणाम होणार असतो. म्हणून चुकलेल्या निर्णयांवर, सत्याचा अपलाप करत वास्तवतेपासून भलत्याच दिशेला नागरिकांच्या भावनेला डायव्हर्ट करण्याच्या प्रयत्नांवर वा केवळ दाखवेगिरीवर टीका करणं साहजिक ठरतं. राज्यकर्त्यांवर असं कोणी तटस्थतेनं बोलत असताना, बोलणारा हा विरोधी पक्षाचा माणूस आहे, असा आरोप करणं हा सत्ताधार्‍यांचा असंमजसपणा ठरतो.

          साहित्यिकांनी अशा राजकीय पोस्ट करू नयेत असं म्हणता म्हणता, साहित्यिक मतदान कसं करु शकतो, असंही उद्या कोणी सहज म्हणू शकेल. कारण मतदान एकाच उमेदवाराला करावं लागतं, ते तुम्ही कसं करू शकता? असं बोलण्याची हिंमतही उद्या कोणी उघडपणे दाखवू शकेल.  

     शेवटी या लेखातला सारांश पुन्हा एकदा अधोरेखित करावासा वाटतो : चुकलेल्या राजकारणावर- सत्ताकारणावर- सत्ताधार्‍यांवर साहित्यिकांनी, विचारवंतांनी, पत्रकारांनी बोललं पाहिजे. बाळबोध वा सुडबुध्दीनं वागणार्‍यांवर सडकून टीका केली पाहिजे. ज्यांना कुठल्या शासकीय मंडळांवर नियुक्त्या हव्या असतील, इतर फायदे हवे असतील ते साहित्यिक वा पत्रकार उघड बोलू शकणार नाहीत. तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न, असंही म्हणता येणार नाही. (सत्तेवर येणार्‍या लोकांच्या पुढं पुढं करून वेगवेगळ्या सरकारी मंडळांवर नियुक्त्या करून घेण्यात अनेक लोक पटाईत असतात. एका मंडळाची मुदत संपत आली की दुसर्‍या मंडळाची तजवीस होईल अशीही फिल्डिंग लावण्यात येते, त्यात ते यशस्वी होतात. सगळीकडं हात असावा म्हणून सगळीकडची एकेक पुस्तकं तयार करून ठेवतात. दुसर्‍याच्या क्षेत्रात घुसखोरी करतात. म्हणून महाविद्यालयीन अभ्यासापासून, सातवीच्या अभ्यासासहीत चौथीच्या अभ्यासातही तेच लोक दिसून येतात, ते सर्वदूर पुरस्कार घेत राहतात. एखादी मोकळी जागा देण्यासाठी आयुष्यभर काम केलेल्या अमूक एकाकडं आपणहून बोट दाखवावा असं यांच्या चुकूनही मनात येत नाही. यत्र तत्र सर्वत्र राक्षसी बळानं ते प्रभाव पाडत राहतात. राक्षसी महत्वाकांक्षेनं सत्ता बळकवणार्‍या लोकांत आणि अशा तथाकथित स्वकेंद्रित तज्ज्ञ लोकांत विशेष फरक दिसून येत नाही.) पण जो कोणी सामाजिक बांधीलकी पाळणारा लेखक असेल, तो समाजाच्या व्यापक भवितव्यासाठी– लोकशाहीसाठी स्वहिताचा त्याग करून बोलत राहील. गप्प बसणार नाही.

          थोडक्यात, कोणी उजवं असो की डावं, गल्लीतलं असो की दिल्लीतलं, घाणेरड्या राजकारणाला आपल्या पातळीवर विरोध केला पाहिजे. विशिष्ट विषारी  भावनेत संमोहीत होऊन देशाला धोकादायक ठरू शकतील अशा शक्य नसलेल्या संकल्पनेतील बागुलबुवांच्या नादी लागलेल्या- आहारी गेलेल्यांनाही वेळीच सावध केलं पाहिजे.

          कोणत्याही राजकीय पक्षात प्रत्यक्ष सक्रीय नसलेल्या- सभासदत्व न घेतलेल्या नि:पक्ष नागरिकांनी विशिष्ट भावनेनं एखाद्या राजकीय पक्षाशी कायमचं नातं जुळवून घेऊ नये. तसेच अधिकृत संदर्भ ग्रंथांतून ऐतिहासिक- राजकीय अभ्यास करावा. म्हणजे राजकारण्यांच्या चुका कळायला लवकर मदत होते. (सोशल मीडियावर फिरणार्‍या संदेशाची खात्री करून घ्यावी. केवळ चुकीच्या प्रचारकी व्हॉटसअॅप संदेशातून आपली मतं बनवू नयेत. असे अनेक संदेश- चित्रफिती ठरवून विकृत पध्दतीनं प्रसारित केल्या जातात.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/