मंगळवार, ३१ मे, २०१६

पळता येणार नाही राजकारणापासून दूर



- डॉ. सुधीर रा. देवरे

मला खुणवायचं नाही कोणत्याही दोन माणसांत
सुरू होणार्‍या राजकारणाबद्दल
मला बोलायचं नाही एखाद्या कार्यालयात
डूक धरणार्‍या सूडकारणाबद्दल
आणि मला टोचायचं नाही एखाद्या गावात
काटा काढणार्‍या राजकारणाबद्दलही.

आत्मप्रौढीने सांगतात लोक, 
राजकारणाबद्दल बोलत नाहीत आपण
आवडत नाहीत राजकारणी आणि
राजकारणात जाणारही नाही चुकून कधी...
अशा तमाम तटस्थ प्रवृत्तीबद्दल बोलायचंय इथं.

कोणाकोणाला आवडतं म्हणे 
राजकारणाविषयी व्देषाचं बोलणं आणि ऐकणंही
तरी अशा तथाकथित कुपमंडूक राजकारणापासून 
राहता येईल का आपल्याला
कायम दोन हात तरी दूर?

तसं असायलाच हवं दूर व्यक्‍तीगत चिखलफेकीपासून
आणि डबक्यात उड्या घेणार्‍या राजकारणापासूनही
पण आता नाही बोलता येत राजकारण गेलं चुलीत
देशाच्या राजनितीपासून दूर झालोत तर
वाढणार आहे शक्यता देशाबद्दल बेफिकीर होण्याची 
काय करतोय माझा देश आणि कायहे त्याची दशा दिशा
याबद्दलही असू शकतो आपण कायम अनभिज्ञ 
माहीतच नाही व्यापक मुळातून समाजव्यवस्था
तर आपण करू शकणार नाही सकारात्मक मतदान.
नेत्याची राजकीय प्रणाली- वृत्ती- प्रवृती 
मुळातून माहीत नसणार आपल्याला
मतदान न करणं यालाही म्हणूनच
काही लोक मानतात आज प्रतिष्ठेचं काम.
महागात पडेल आपल्याला दिवसेंदिवस असं
राजकारणाकडे पाठ फिरवून डोळेझाक करणं.
          
आपण कितीही स्वीकारला आपल्यापुरता अराज्यवाद
तरी या राजकीय बेड्या तोडणं शक्य आहे काय?
आपण गावातील पंचाला निवडून देणार नसू
नगरसेवकाला निवडून देणार नसू
परिषद- पंचायत सभासद निवडून देणार नसू
आमदार-खासदार निवडून देणार नसू
तर अराज्यवाद पाळतो म्हणून पावलापावलांवरच्या
करांपासून मिळेल का मुक्‍ती आपल्याला कधी?
कोणाकडून करून घेणार आपण
आपल्या गावदेशाची भौतिक प्रगती
सरकारची गुंतवळ नाकारून आपल्याला
कसं राहता येईल शासनात कायद्यात नियमात?
        
राजकारण करणं आपलं काम नाही
भल्या माणसाचा तो प्रांत नाही
असं म्हणत आपण राजकारणापासून लांब राहायचं
आणि जातांधळ्या धर्मांधळ्या कामांधळ्या
पैशांधळ्या कायद्यांधळ्या देशांधळ्या व्यसनांधळ्या
ऑफिसांधळ्या लुटारू आतंकींचे उतलेले प्रताप पहात 
त्यानांच मुकाट्याने मतदान करत परतायचं 
नामदारांकडून चांगली कामं होण्याची 
अपेक्षा करत रहायची पाच वर्ष मुकाट्यानं मनातल्यामनात
असा हा सगळा तिढा कोणाशी वैर नको म्हणून.
        
अब्राहम लिंकन, चर्चिल, मंडेला, गोर्बाचेव्हसह...
आंतरराष्ट्रीयच नव्हे नुसत्या देशात होऊन गेलेल्या
नेत्यांच्या नावावरूनही फिरवली नजर
तर नाही दिसत असं समीकरण कुठं
फक्‍त राजकारणी आणि राजकारण
विविध पैलूदार लोक भेटतात इतिहासात-
गांधी, टिळक, बोस, रानडे, नेहरू, 
राजेंद्र प्रसाद, योगी अरविंद, आंबेडकर, 
शास्त्री, पीव्ही नरसिंहराव, व्हीपी सिंग,
अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण,
शरद पवार, ग प्र प्रधान, एस एम जोशी, डांगे आदींनी
राजकारण नाही केलं फक्‍त सत्तेचं तथाकथित 
पेक्षा ती अजून आहेत कोणीतरी महान 
कोणी कवी, कोणी साहित्यिक, गणिती,
तत्वज्ञ, विचारवंत, समाजिक कार्यकर्ता,
संशोधक, समाजसुधारक अशा विविध क्षेत्रातून
घडत जातात राजकीय व्यक्‍तिमत्वं
आणि इतिहासही घडवत राहतात
विविध स्तरातून राजनितीत येणारे इसम
दुर्गा भागवत अलिप्त राहिल्या असत्या
अशा राजकारणापासून तर लादलेल्या आणीबाणीला
करता आला नसता त्यांना बंडखोर बेडर विरोध.
        
- तात्पर्य,
आपल्याला पहायचे असतील बेरजेच्या राजनितीत
विचारवंत, साहित्यिक, तत्वज्ञ, सुधारक, शास्त्रज्ञ, संशोधक
तर आपण सक्रीय राजकारणातून राहिलोत दूर तरी
एकूण शतरंजच्या खिलाडी कुरघोड्या घडामोडींपासून
पळता येणार नाही आपल्याला खूप लांब
किमान आपल्याला करावं लागेल जागल्या होऊन
वजाच्या राजकारणावर वाजवी टीका करायचं चोख काम. 

      (या वेळी पहिल्यांदा मुद्दाम कवितेच्या फॉर्ममध्ये ब्लॉग लिहायचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी झाला ते माहीत नाही. ब्लॉग कविता म्हणून न वाचता लेख म्हणूनच वाचावा. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ मे, २०१६

जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!



-         डॉ. सुधीर रा. देवरे

      मला एका संपादक मित्राने विचारलं, लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का? 
मी म्हणालो, नाही.
मी पटकन दिलेल्या नाही उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, का?
      कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी. उलट पाण्यासारखा पैसा खर्च करणे हा वाक्‍प्रचार आपल्याकडे सुरू झाला. म्हणजे पाण्याला किमंत शून्य. पूर्वी पाणी फुकट आणि जिकडे तिकडे मुबलक उपलब्‍ध असल्याने पाण्याची महात्मता वा काटकसर मौखिक वाड्‍.मयात दिसून येत नाही. मात्र लोकसंख्येच्या प्रचंड स्फोटाने आणि जंगल तोड- वृक्ष तोड झाल्याने पाण्याची निकड आता उत्पन्न होत आहे.
      संपादक महाशयांचे शंका निरसन झाले. पण पाणी हा आज सगळीकडे चिंतनाचा विषय झाला याचं कारण काय? पश्चिम आशिया खंडातल्या देशांत वाळवंट आहे. पाण्याची कमतरता पूर्वीपार आहे. म्हणून तिथले लोक आठवड्यातून एक दिवस अंघोळ करतात. त्या मानाने भारतासारख्या देशात पाण्याची उपलब्‍धता परंपरेने विपुल असल्याने आपण रोज अंघोळ करतो. (आणि आपल्या वाहनांनाही- गाड्यांनाही रोज अंघोळ घालतो. रोज घराच्या फरश्या धुतो. अर्धा ग्लास पाणी पिऊन अर्धा ग्लास फेकतो. गल्लीतून- गटारातून पाणी वाहू देतो, पण आपण नळाच्या तोट्या बंद करत नाही. बोअरवेल स्वत:च्या पैशांनी केली असली तरी त्यातून येणारे पाणी हे नैसर्गिक आणि सामाजिक आहे याचे भान आपण ठेवत नाही.) पाणी वाचवण्याचे दाखले भारतात मिळत नाहीत. भरपूर पाऊस आणि दु्‍थड्या भरून वाहणार्‍या नद्या आपण टिकवून ठेवल्या नाहीत. तात्पुरत्या स्वार्थाने त्या प्रदुषित केल्या आणि जंगलेही गरजेपेक्षा झपाटयाने नष्ट केलीत. ब्रिटीश राजवटीत दूरदृष्टीने काही नद्यांवर धरणं बांधली गेलीत. त्याचे फायदे आपल्या लक्षात आल्याने आपणही स्वतंत्र भारतात धरणं बांधू लागलो. धरणांचे फायदे आता आता आपल्याला दिसू लागली आहेत.
      पाणी, पाऊस, भूजल पातळी म्हणजे जमिनीतली पाणी पातळी यांचा खूप जवळचा संबध झाडांशी आहे, डोंगरांशी- पर्वतांशी आहे आणि त्यांच्यावर उभ्या असलेल्या जंगलावरही पाण्याचा संबंध आहे. म्हणून जलसाक्षरता राबवतानाच्या प्रचारात झाडांना विसरून चालणार नाही. फुकट मिळणारा अमर्याद प्राणवायू झाडांपासून मिळतो आणि आपल्याला प्रदुषणापासून वाचवते ते ही झाडच. म्हणून फळ न देणारी झाडं असलीत तरी ती आपण जपली पाहिजेत! आपल्याला झाडं लावता येत नसतील तर किमान तोडू तरी नये वा तोडायला कोणी उद्युक्‍त होईल अशी कृती टाळायला हवी. झाडांपासून म्हणजे लाकडांपासून बनवलेल्या वस्तू वापरण्याचं थांबवायला हवं. आपल्या प्रत्येक वाढ दिवशी आपण एकेक झाडं लावून ते वाढवायला हवं- जगवायला हवं.
      आतापर्यंत आपण पाण्यासारखा पैसा खर्च करतो, असं फुशारकीने म्हणत होतो. यापुढे मात्र आपल्याला पैशांसारखे पाणी खर्च करता येणार नाही. पैसे छापता येतात, म्हणून कमवता येतात! पाणी छापता येत नाही. म्हणून कमवताही येणार नाही! हे लक्षात घेऊन यापुढे आपण पाणी अडवलं पाहिजे. साचवलं पाहिजे. जिरवलं पाहिजे. पाण्याची काटकसर करणार्‍या कोणालाच कंजुष म्हणता येणार नाही.
      या पारंपरिक पाण्याच्या देशात पाणी वाचवायचं कसं? जलसाक्षरता आपल्या समाजात रूजता रूजत नाही. पाणी आपण स्वत: वाचवावंच पण कसं वाचवावं याबाबत दुसर्‍यालाही सुचना कराव्यात. मार्गदर्शक करावं. जशी आपण गावपातळीवर वर्गण्या काढून आतापर्यंत सार्वजनिक मंदिरे बांधत आलो, तशी पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना गावागावात श्रमदान करून सामुहीक पध्दतीने राबवायला हवी. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रातल्या काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ आहे. अशा वातावरणात ओठांवर गाणं आलंच तर ते असं येतं:
      पानी रे पानी तेरा रंग कैसा ।
सुखे मे मिला हुआ घडा जैसा ।।

      (महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावर शुक्रवार,  दिनांक २९ एप्रिल, २०१६ ला प्रकाशित झालेला माझा लेख. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, ३० एप्रिल, २०१६

ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण





-         डॉ. सुधीर रा. देवरे

         बरोबर चार वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष  एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉग लेखनाने माझ्या अन्य लिखाणावर प्र‍तिकूल परिणाम होतो असे लक्षात आल्याने दोन वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत असतो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या चार वर्षात एकही खंड जाऊ दिला नाही. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळत आलो. 
         या सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, वैश्वीक, आंतकविरोध, शेती, पाणी, चरित्र, व्यक्‍तीविशेष, बोलीभाषा, अहिराणी भाषा, विविध पडसाद आदी विषय येत गेले. काही लेख देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे. चार वर्षातील लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईल. एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा असतो.
         या ब्लॉगचे आंतरजालावर स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी, व्टिटर, मिसळपाव या संकेतस्थळासह फेसबुकवरही टाकतो. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत असतो. आता (1 नोव्हेंबर 2014 पासून) व्हॉटस् अॅपवरही माय ब्लॉग्स् नावाचा ग्रुप सुरू केला. अनेक लोक ब्लॉग आवडला म्हणून परस्पर इतरांना फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे आंतरजालावरील ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी, व्टिटर, मिसळपाव, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास साडेतीन हजार ते चार हजार वाचक वाचतात हे वाचक खुणांवरून लक्षात येते. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. काहीतरी आतून सांगायचे असते. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणे आणि अप्रत्यक्षपणे झालेच तर प्रबोधन एवढ्याच ध्येयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतो. प्रपंचासाठी करावी लागणारी नोकरी सांभाळत, (नोकरीत सर्वात जास्त वेळ खर्च होतो.) माझे इतर लेखन आणि ब्लॉग लिहिणे यासाठी वेळ सांभाळणे खूप कठीण जाते. ब्लॉगमुळे माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, हे ही लक्षात आलंय. पण ब्लॉग लिखाण सातत्यातून मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकत नाही.
         चार वर्षातील या छोट्या लेखांची जवळपास जाणारी संख्याच सांगायची झाली तर ती 160 (एकशे साठ) इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे असे मला वाटते. बघूया. या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. दर महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला ब्लॉग देण्याचा दिवस कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करीन. कला, साहित्य, भाषा, लोकसंस्कृती, लोकजीवन, वैचारिक ‍लेखन अशा स्वतंत्र लेखनाबरोबरच माझे इतरत्र प्रकाशित झालेले लिखानही ब्लॉग मधून देत असतो- देत राहील. माझ्या ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जर आपण माझे याआधीचे इतर ब्लॉग वाचून त्यांच्या संदर्भातही काही सुचना केल्या वा प्रतिक्रिया दिल्या तर मला आनंद वाटेल. आधीचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आतापर्यंतचे माझे सर्व लेख वाचता येतील. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळे मला लिखाण करण्याची ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी टिकवून आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रिया सुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढेही घेत रहायचा का? या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का? प्रबोधन होते का? वा तसे होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का? अशा प्रश्नांचे मंथन जरूर व्हावे ही विनंती. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.

   - डॉ. सुधीर रा. देवरे            
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

साथ : एक आकलन





- डॉ. सुधीर रा. देवरे

   साथ
           
हा रस्त्यावरचा
      दीप क्षीण तेजात
तेवतो एकटा
      भीषण काळोखात
- तिष्ठते कुणि तरी
      समोरच्या खिडकीत ;
केव्हढी तयाची
      सोबत आणिक साथ.
              - इंदिरा संत

      साथ! श्रीमती इंदिरा संत यांची ही कविता. फक्‍त आठ ओळींची आणि दोन कडव्यांची आहे. या कवितेतला प्रत्येक शब्द महत्वाचा असून कविता आस्वादण्यापूर्वी तिच्या शब्दांचा म्हणजेच तिचा भाषिक पसारा पाहू :
हा          - कोणताही दीप नव्हे. विशिष्ट दीप. म्हणून हा.
रस्त्यावरचा   - पोरका, तुटलेला, फेकलेला, वाळीत टाकलेला, तोडलेला,
             एकाकी.
दीप         - जिवंतपणाचे प्रतीक.
क्षीण तेजात तेवतो तेवतो : जिवंततेचे लक्षण. मात्र तो क्षीण तेजात तेवतो. दीप तेवतो त्या अर्थी त्याची स्वाभाविक तेजात तेवण्याची क्षमता- प्रकृती आहेच. पण त्याला स्वाभाविकपणे तेवण्यास वीज पुरवठा कमी होत असला पाहिजे. म्हणून क्षीण तेजात तेवतो.
एकटा        - एकाकी, लोन्लीनेस.
भीषण काळोख- निराश, अपयश, दु:खात बुडालेला, दुर्दैव, वैफल्यग्रस्त, शापित.
तिष्ठते       - प्रतिक्षा.
कुणि तरी    - सचेतन- सजीव संज्ञा. आपल्या अतिजवळच्या प्रिय व्यक्‍तीचा उल्लेख कुणि तरी म्हणून होतो. प्रियकर.
खिडकी - म्हणजे दार नव्हे. खिडकी: जिच्यातून बाहेर जाता येत नाही. स्वप्न, इच्छा, आकांक्षा आणि मर्यादांचेही प्रतीक.
केव्हढी - परिमाण. पण इथे अनंतता. केव्हढी या शब्दाने परिमाणाची फूटपट्टी अपूर्ण पडत असल्याचे सूचित होते.
सोबत       - सोबत असणे.
साथ         - मैत्री

      कवितेच्या या भाषिक अर्थांच्या साहाय्याने आता कविता आस्वादू:
हा रस्त्यावरचा दीप म्हणजे अभिप्रेत असलेला विशिष्ट दीप, जो रहदारींच्या रस्त्यालगत एकाकी आहे. एकाकी असला तरी तो स्वयंपूर्णतेने तेवणाराही आहे. मात्र लौकीक दृष्टीने हा दीप क्षीण तेजात तेवतो आहे. किंबहुना अडगळीतल्या वस्तुवत अचेतन आहे. कारण सदरहू दीपाच्या या विशिष्ट तेजाचे आकलन व्हायला सभोवतालच्या अंधाराला कलात्मक आत्मिक आनंदाचे सहावे इंद्रियच नाही. (सहावे सुख ही चिनी संकल्पना आहे. ज्या गोष्टींमुळे माणसाला निखळ आत्मिक आनंद मिळतो, ते सहावे सुख. आणि ज्याला ते प्राप्त होते, त्याला सहावे इंद्रिय आहे असा समज.) या अंधाराला माहीत आहे फक्‍त रस्त्यावरचे रहदारीचे नियम. रूढी- परंपरेचे ओझे सावरत रस्त्याने चालणे. म्हणून या अंधाराच्या सनातन परंपरेने या दीपाभोवती एका अपघाताने भीषण काळोखाचे कडे करून ठेवले कुंपण करून ठेवले आहे.
      पहिल्या कडव्यात झाले दीपाच्या एकाकीपणाच्या वस्तुस्थितीचे वर्णन.
      दुसर्‍या कडव्याला सुरूवात होते, ती ओळीच्या सुरूवातीच्या - अशा एका आडव्या रेषेने. ही रेषा पहिल्या कडव्याला दिलेली कलाटणी सूचित करते. म्हणून ही रेषा तरीही, पण, मात्र या अर्थाची वाटते.
      पण या क्षीण तेजाच्या प्रतिक्षेतही कुणि तरी समोरच्या खिडकीत तिष्ठते. आता मात्र हे तेज क्षीण रहात नाही. या क्षीण तेजातही सहावे इंद्रिय लाभलेला एक रसिक समोरच्या खिडकीत उजाळून निघतो, कुणि तरी ही प्रेमळ संज्ञा घेऊन. ही अंतर्मुख अस्पर्शित प्रीत दीपाला केव्हढा दिलासा देणारी! हा दिलासा परिमाणाची फूटपट्टी थिटी पाडणारा आहे. केव्हढी हा परिमाणवाचक नेमका शब्द इथे प्रभावीपणे काम बजावतो. विशेष परिणामकारक ठरतो. केवढी या शब्दाने परिमाणात न बसणारा दिलासा अगदी सहज व्यक्‍त होतो. म्हणूनच या भोवतालच्या भीषण काळोखात ही सोबत परिमाणात मोजता न येणारी सोबत ठरते. भीषण काळोखाच्या पार्श्वभूमीवर तर ही सोबत सात जन्माच्या परिमाणाहूनही प्रभावी ठरते.
      शेवटचे कडवे- म्हणजे दुसरेच कडवे अजून एकदा नीट काळजीपूर्वक वाचले की त्यातून आणखी एक निराळाच अर्थ डोकावू लागतो. त्यातून दीपाला बोचणारी खंत दृगोचर होऊ लागते. ती खंत म्हणजे ही सोबत नुसती सोबतच आहे. ती साथ ह्या अर्थाची सोबत नाही. कुणि तरी चे दीपाशी मिलन शक्यच नाही, पण संवाद होणेही शक्य नाही. कारण कुणि तरी  खिडकीत आहे. खिडकीतून कुणि तरी बाहेर पडू शकणार नाही आणि दीपाला आपला अचेतन खांब सोडता येणार नाही. दोघांना वस्तुस्थितीचे जडत्व पुन्हा जाणवू लागते. भीषण वस्तुस्थितीची दोघांना चांगल्यापैकी जाणीव आहे. म्हणूनच त्यांची साथ या अर्थाची खरी सोबत नाही, तर नियतीने त्यांना केवळ समोरासमोर आणून जखडून टाकले आहे- एकाला खिडकीच्या चौकटीत तर दुसर्‍याला कराल खांबावर. इथे दोघांचे फक्‍त एकमेकांसाठीचे असणे जाणवते. शेवटी हताशपणे दोघांना वस्तुस्थितीला सामोरे जाऊन, आहे त्याच परिस्थितीत समाधान मानणे इष्ट वाटते. तीच ही एकमेकांना एकमेकांची सोबत आणि साथ. (सदर आस्वाद कविता-रती 1989 च्या इंदिरा संत विशेषांकात प्रसिध्द झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

गुरुवार, ३१ मार्च, २०१६

भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी





- डॉ. सुधीर रा. देवरे

      भारताचा शेतकरी कधी आधुनिक होईल? भारताच्या शेतकर्‍याची स्थिती इतकी दयनिय होण्याची कारणे काय? दुष्काळात शेतकर्‍यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो? पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो? गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो? आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे? इतका दैवाधिन का आहे? इतका पारंपरिक का आहे? इतका कर्जबाजारी का आहे?  त्याला कर्जावू परिस्थितीवर मात का करता येत नाही? असे असंख्य प्रश्न शेतकर्‍यांच्या बाबतीत विचार करताना उद्‍भवू लागतात.
      खरं तर भारतातील सर्व शेतकर्‍यांपुढील समस्या सारख्याच नाहीत. नुसतं महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तरी सर्व शेतकर्‍यांच्या समस्या सारख्या नाहीत. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागातील शेतकर्‍यांचे प्रश्न भिन्न आहेत, हे लक्षात येईल. प्रत्येक ठिकाणी शेताच्या जमिनीचा पोत भिन्न आहे, म्हणून तिथे वेगवेगळ्या पिकांसाठी शेती केली जाते. भाऊबंदकी वाट्यांमुळे शेतीचे दिवसेंदिवस छोटे छोटे तुकडे होत आहेत. म्हणून सलग शेती करता येत नाही. शेतकर्‍यांचे कामाचे तास ठरलेले नसतात. पहाटेपासून सायंकाळी अंधार पडेपर्यंत शेतकरी शेतात राबत असतो. शेतकर्‍याला रविवारची साप्ताहिक सुट्टी नसते. शेतकर्‍यांपर्यंत अनेक योजना पोचत नाहीत. शेतकर्‍यांपर्यंत त्यांचा पैसा पोचत नाही. पोचला तर तोपर्यंत अनेक ठिकाणी झिरपत तो अल्पप्रमाणात त्याच्यापर्यंत पोचतो.
      भारतात शेतकर्‍यांच्या अनेक चळवळी झाल्या. भारतात शेतकरी बहुसंखेने असला तरी भिन्न भिन्न समस्यांमुळे तो अखिल भारतीय पातळीवर संघटीत होऊ शकत नाही. म्हणून वेगवेगळ्या भौगोलिक प्रांतात वेगवेगळ्या शेतकरी संघटना कार्यरत झाल्या. आजही शेतकर्‍यांसाठी लढणारे अनेक नवीन नेते उदयास येत आहेत. पण शेतकर्‍यांच्या समस्या कमी व्हायला तयार नाहीत. शेतकर्‍यांचा शेतीमाल हा दलालांमार्फत खरेदी केला जातो. थेट खरेदी केला जात नाही. देशात अनेक उत्पादक वस्तूंच्या किमती नक्की केलेल्या असतात. मात्र शेतीमालाचेच भाव कोसळतात आणि चढतात, असे का होते, याचाही कोणी मूळातून विचार करत नाही. म्हणजे उत्पादकता कमी जास्त होते का? एखाद्या विशिष्ट व्यापारी पिकाचे अतिरिक्‍त उत्पादन करताना तारतम्य दाखवले जात नाही का? परिणामी भाव कोसळतात. त्याच वेळी अन्य अन्नधान्य तुटवडा भासू लागतो. उदाहरणार्थ, आता सर्वच प्रकारच्या डाळींचा जाणवू लागलेला तुटवडा. अशा परिस्थितीचा फायदा घेत व्यापारी साठेबाजी करू लागतात आणि भाव चढतात. या भाव वाढीचा थेट फायदा शेतकर्‍याला न होता तो व्यापार्‍यांना होतो. उदाहरणार्थ, एका तालुका पातळीवर जेव्हा फक्‍त एकाच कांद्याच्या गाडीचा लिलाव पाच हजार रूपये क्‍वींटल जातो. त्यावेळी इतर कांदे तीन हजार, दोन हजार या भावाने घेतले जात असले तरी त्या दिवसापासून सर्वच प्रकारच्या कांद्यांचा भाव साठ सत्तर रूपये किलो होतो. अशा भाववाढीचा फायदा शेतकर्‍याला होत नाही. 
      जलसाक्षरता अजून शेतकर्‍यांपर्यंत कोणी पोचवायला तयार नाही. पीक विमा कसा काढावा आणि त्यामुळे आपल्या पिकांचे संरक्षण कसे करावे याचे प्रबोधन कुठे होताना दिसत नाही. कर्ज मिळतं मग कशाला सोडा, ही वृत्ती कशी घातक आहे आणि त्यामुळेच आत्महत्येंचे प्रमाण कसे वाढले आहे, हे ही कोणी समजून घ्यायला तयार नाही. म्हणून खाजगी सावकारी कर्ज तर नकोच पण सरकारी कर्ज सुध्दा गरज असेल तरच घ्यायला हवं, असंही कोणी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना दिसत नाही.
      उदाहरणादाखल इथं दोन गोष्टी नमूद करतो: माझा एक मित्र शेतकरी आहे. नुसता शेतकरी नसून श्रीमंत शेतकरी आहे. तरीही गावातल्या शेतकरी सोसायटी पासून तालुक्याच्या अनेक बँकांचे कर्ज त्याच्या नावावर आहे. त्याला याबद्दल मी विचारलं असता त्याने सांगितलं, ‘असा कोणताही शेतकरी सापडणार नाही की त्याच्या अंगावर कर्ज नाही. म्हणजे कर्जाची गरज नसली तरी शेतकर्‍याने मिळेल तिथून कर्ज घेतच रहायला हवं. त्यातच त्याचा फायदा आहे. एक तर शेतकर्‍याला कमी दरात कर्ज उपलब्ध होतं, त्यातून काही सबसिडीने फिटतं आणि तो पैसा शेतीसाठीच अथवा इतर कामांना वापरता येतो. म्हणून शेतकरी कोणताही असो. त्याला पैशांची गरज असो वा नसो, तो कर्ज काढतच राहतो. घेतलेलं कर्ज सुट मिळालं तर अजून फायदा असतोच.’ ऐकून मी सुन्न.
      दुसरा माझा एक मित्र प्राथमिक शिक्षक आहे. त्याची पत्नीही शिक्षिका. म्हणजे आर्थिक परिस्थिती उत्तम. पण वारसा हक्काने मिळालेल्या शेतीचा सातबारा उतारा त्याच्याकडे असल्याने मध्यंतरी त्याने शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेलं, ‘सोने गहाण कर्ज’ घेतलं. त्या कर्जाबद्दल त्याला विचारलं तर त्याचं उत्तर, ‘सोनं गहाण ठेऊन फक्‍त तीन टक्के दराने शेतकर्‍यांसाठी कर्ज मिळतं. सोनं घरात ठेवायचं म्हणजे चोरीला निमंत्रण. आणि बँकेत लॉकर मध्ये ठेवलं तर लॉकरला पैसे लागतात. त्यापेक्षा सोनं तारण ठेवलं तर चोरी होण्याचीही भीती नाही आणि फक्‍त तीन टक्के दराने मिळणारं कर्ज. फायदाच फायदा.’ हे उत्तर ऐकूनही सुन्न होत माझ्या सामान्य ज्ञानात भर पडली.
      पण अशा लोकांमुळे ज्या शेतकर्‍याला खरोखर कर्जाची गरज असते अशा लहान गरीब शेतकर्‍यांना यामुळे नक्कीच फटका बसत असेल. भारताच्या शेती धोरणात गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी अशी खूप सक्‍त अंमलबजावणी करणारी रेषा अस्तित्वात नाही. म्हणून ‘सब घोडा बारा टक्के’ या न्यायाने कुठं ओलं जळतं तर कुठं खायलाच नाही अशी परिस्थिती आहे. वीज फुकट दिली तर विजेचे बल्ब रात्रंदिवस शेतातून सुरू असलेले दिसतात. कुठलीही काटकसर नाही. पाणी असेपर्यंत कसंही वाया घालवायचं. कुठलीही काटकसर करायची नाही. (घरे बांधतांनाही रेन वॉटर हार्वेस्ट अजून लागू होत नाही. जमिनीला छिद्रे पाडून बोअरवेल करून अतोनात पाणी वाया घालवलं जातं. यामुळे जमिनीतली पाणी पातळी दिवसेंदिवस खाली जात आहे.) प्रत्येकाने सुज्ञ होऊन अशा गोष्टी टाळायला हव्यात.
      पावसाळा सुरू झाला तर पावसाचं पाणी वाहून कसं जाणार नाही. आपल्या शेतात, शेताजवळच्या नाल्यात, नदीत पाणी कसं जिरेल हे शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गावपातळीवर ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही योजना स्वयंत्स्फूर्तीने राबवायला हवी. प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलायला नको. ‘ असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ या न्यायाने, असेल सरकार तर करील दुष्काळ निवारण, ही वृत्ती घातक आहे. प्रत्येक शेतकर्‍याने शेततळे तयार करायला हवे. त्यासाठी शासनाने आता अनुदानही सुरू केलं आहे. पाणी कमीतकमी वापरून पाण्याची बचत करायला हवी. पाणी आपल्या शेतात आणि आजूबाजूच्या परिसरातही कसं जिरेल हे पाहिलं पाहिजे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून शेताच्या बांधाला, शेततळ्यांच्या काठाला, विहिरींच्या आजूबाजूला, नाल्यांच्या आणि नद्यांच्या काठाने झाडं लावायला हवीत. पिण्यासाठी नदीत धरणांतून पाणी सोडलं की नदीकाठचे शेतकरी वीज मोटर लावून नदीचे पाणी शेतात खेचून घेतात. नदीकाठी विहिरी खोदून पाईप लाईन करून दूरवरून पाणी शेतात घेऊन येतात. पण पावसाळ्यातले पावसाचे फुकटचे पाणी शेतात अडवण्याचा कोणताही प्रयत्न शेतकर्‍यांकडून होत नाही. चार महिण्याच्या पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्ट शेतातही करायला हवे. शेताजवळच्या नाल्यांमध्ये शेतकर्‍यांच्या गटागटाने विशिष्ट अंतरावर बांध घालून पाणी अडवले तर मध्यंतरी एखाद्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला तरी आतासारखा दुष्काळ सतावणार नाही. आजचा शेतकरी एकीकडे शेतात तंत्रज्ञान वापरू लागला, मात्र जलसाक्षरतेच्या बाबतीत तो अजिबात जागरूक दिसून येत नसल्याने आणि पावसाळ्यात आपल्या सोयीप्रमाणे पाऊस यावा असा दैवाधिन विचार करत असल्याने दुष्काळाच्या संकटातून त्याला बाहेर पडता येत नाही.
      शेतीसाठी असणारी अवजारे, तंत्रज्ञान हे आधुनिक पध्दतीने वापरायला हवे. सेंद्रिय खते, सेंद्रिय फवारणी आपल्या हिताची आणि स्वस्तही आहे. म्हणून अशा गोष्टींचा अंगीकार करायला हवा. अमूक करतो म्हणून आपणही तेच पिक काढावं असा अट्टाहास न धरता आपल्या जमिनीचा कस पाहून शेती करायला हवी. कांद्याला भाव आहे, मग लावा सर्व कांदा. दाळींब खूप पैसा देतो, मग लावा सर्व बाग... हे सोडलं पाहिजे. व्यापारी पिकांसोबतच गहू, बाजरी, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला आदी सर्व प्रकारची पिकं आलटून पालटून शेतात घेतली गेली पाहिजेत. एकाच प्रकारच्या पिकावर विसंबून न राहता वेगवेगळी पिके थोडी थोडी एकाच वेळी घेतलीत तर एका पिकाने (अवकाळी पावसामुळे वा विशिष्ट रोगामुळे) धोका दिला तर दुसरं पिक थोडाफार आधार देऊ शकतं. एका बाजूने शेतकरी दिवसेंदिवस व्यापारी पिके घेऊन, तंत्रज्ञानाने शेती करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करतो, तर दुसर्‍या बाजूने मात्र तो अजूनही पावसाळ्यावर पारंपरिक पध्दतीने दैवाधिनतेवर अवलंबून असताना दिसतो. पाणी दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेताला सारंगने पाणी देणे, वाफ्यांना बारा देत पाणी देणे आज चूकीचे ठरेल. तुषार सिंचन, ठिबक सिंचन या तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रत्येकाने काटकसरीने वापरलं पाहिजे. हे फक्‍त आजच्या शेतकर्‍यानेच नव्हे, तुम्ही आम्ही सर्वांनी अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या, पाणी बचत केली, वृक्षसंवर्धन केलं तर शेती व्यवसायात खूप चांगला परिणाम दिसून येईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो.
      (महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज (www.mahanews.gov.in/) या संकेतस्थळावर या लेखातील काही भाग सोमवार, दिनांक 21 मार्च 2016 ला प्रकाशित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, १४ मार्च, २०१६

एक कविता : भाषेची




- डॉ. सुधीर रा. देवरे

           डॉ. गणेश देवी स्थापितभाषा संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून म्हणजे 1997 पासून मी जोडला गेलो, तेव्हापासून माझे नेहमीच बडोद्याला जाणे होत राहते. मध्यंतरी अहिराणीढोलच्या संपादनामुळे बडोद्याला जाणे नित्याचेच झाले होते. माझी मातृभाषा अहिराणी, शैक्षणिक भाषा मराठी, आणि प्रसंगी कामचलाऊ असे हिंदी, इंग्रजीचे ज्ञान. या व्यतिरिक्‍तच्या बाकी भाषा म्हणजे मलाकाळे अक्षर म्हैस बरबरअशा अगम्य.
            ढोलच्या एका अंकाच्या फायनल प्रुफ रीडिंगसाठी बडोद्याला गेलो असताना,
कॉम्प्युटरशेजारी बसून स्क्रिनवर महिला ऑपरेटरकडून मी दुरुस्त्या करून घेत होतो. दोघांना समान कळणारी भाषा म्हणून आम्ही आपसात हिंदी बोलत होतो. हिंदीच्या मला ज्या मर्यादा होत्या तशा ऑपरेट करणार्‍या महिलेलाही होत्या. माझी मातृभाषा अहिरानी- मराठी तर ‍त्यांची गुजराथी. ेवढ्यात या कामाच्या संदर्भातच त्या माझ्याशी केव्हा गुजराथी बोलू लागल्या ते त्यानांही कळल नाही. (आपण बेसावध असलेल्या क्षणी आपली नैसर्गिक भाषा आपण आपल्या नकळत बोलायला लागतो हे ही इथे लक्षात घेतले पाहिजे.) त्या आपल्या मनाशी बोलताहेत की काय म्हणून मी गप्प. माझ्याकडून त्या महिलेला प्रतिसाद मिळत नाही अस ध्यानात आल्यावर त्यांनी माझ्याकड पाहिल. मी म्हणालो, ‘‘आप क्या बोल रही है, मेरी समझ में नहीं आ रहा। ’’
            माझे हिंदी वाक्य ऐकताच त्यांनी तोंडातून जीभ बाहेर काढत कपाळावर हात मारून घेतला आणि जिभेवरची गुजराथी भाषा गुंडाळून त्या माझ्याशी पुन्हा हिंदी बोलू लागल्या.
            ही छोटीशी आणि कोणालाही कायम परिचित असलेली घटना. पण बडोद्याहून परतीच्या बस प्रवासात हा प्रसंग माझ्या चिंतनाचा विषय झाला होता. भाषा आपल्याला किती केविलवाण करून टाकते पहा! आपली मातृभाषा जशी नैसर्गिकपणे आपल्याकडून बोलली जाते तशी नंतर शिकलेली- कमावलेली एखादी भाषा तिची जागा क्वचितच घेऊ शकते. मागे 1997 सालीसाहित्य अकादमीआयोजितलोककलां- लोकसंस्कृतीवरील चर्चासत्रासाठी मिदनापूर- लकत्त्याला गेलो होत. तेव्हाही थोडीफार येणारी इंग्रजी आणि हिंदीच्या मदतीने मी संभाषणात वेळ मारून नेत होतो. पण अजिबात न कळणार्‍या बंगाली भाषेच्या संदर्भात मी अंतर्मुख झालो होतो. (दिल्ली आणि भोपाळला अशाच कृतीसत्रात पण तिथल्या स्थानिक बोलीभाषा हिंदी मुळे अस प्रकर्षान जाणवल नव्हत. चित्रपट मात्र सबटाइटल्स मुळे आपण कोणत्याही भाषेत पाहू शकतो आणि दृक हावभावातही अर्धे अधिक समजत राहतो.)
            मिदनापूर नंतर हीच घटना 2003 साली म्हैसूरला आवृत्त होत होती. जानेवारी-फेब्रुवारी दोन हजार तीन मध्ये कर्नाटकातील म्हैसूर येथीलकेंद्रीय भाषा संस्थानात पंधरा दिवसांसाठी कृतिसत्रात उपस्थित होतो. दिवसभर सेमिनारमधील चर्चांचा आस्वाद घेऊन रात्री आम्ही विविध नाटकांना जायचो. नाटकांना जाताना भाषेची निवड दुय्यम ठरत होती. ज्या भाषेत उपलब्ध होईल ते पहायचं. यात यक्षगान अंतर्भूत असलेली नाटकं, जास्त करून कन्नड तर एक हिन्दी नाटकही बघायला मिळालं. एक जेनु कुरुबाह्या स्थानिक आदिवासी जमातीवरील त्यांच्याच बोलीतील डॉ. केकरीं नारायण लिखित व डॉ. एम. एस. सत्यू दिग्दर्शित नाटक पाहिलं. आदिवासी युवकांकडूनच (आदिवासींमधील तीस कलाकार घेऊन) बसवून घेतलेल्या या नाटकाचा आस्वादही (भाषा येत नसल्याने) केवळ सादरी करणाच्या गुणवत्तेमुळ कायम लक्षात राहील, असा मनपटलावर कोरला गेला. दैनंदिन कामाच्या संवादात तर समोरून येणारे उत्तर बहुतकरून कानडीत मिळत असे.
            म्हैसूरयेथील पंधरा दिवसांच्या निवासात ह्या दैनंदिन गोष्टींमुळे चिंतनातून
काही निरीक्षणही नोंदवली जात होती. त्यात भाषेचा मुद्दा अग्रक्रमाने येत होता. इंग्रजी ही परकीय देशातील भाषा आपण वाचू शकतो, लिहू शकतो, ऐकून तात्पर्य समजू शकतो. रंतु भारतातीलच मात्र परप्रांतीय भाषा - कानडी - आपण कामचलावू म्हणून सुद्धा समजून घेऊ शकत नाही, ते कोणत्या मानसिकतेमुळ? (खरं तर भाषेच्या अज्ञानामुळं. मानसिकतेमुळं नव्हे!) असा विचार मनात थैमान घालत खूप वेदना देऊ लागला. ही बोच काही केल्या मनातून जात नव्हती. बडोदा आणि कलकत्ता येथील घुसमटीप्रमाणेच म्हैसूरलाही भाषेची ही जीवघेणी घुसळण सुरू झाली होती.
            या अनुभवांचा इजा, बिजा, तिजा आता पूर्ण होत होता. जिथ जिथसंवादाआड भाषा येऊ लागली तिथ तिथ माझी शैक्षणिक अर्हता मला सतावू लागली होती. भाषा आली नाही तर आपलं उच्च शिक्षण आपल्या कामास येत नाही, हे लक्षात येऊ लागलं. कामकाज आटोपल्याच्या म्हैसूर मुक्कामीच एका संध्याकाळी या चिंतनाच्या घुसळीतून माझ्या तोंडातून मला न कळत उत्स्फूर्तपणे तीन ओळी आल्या:

मी मराठीतला पीएच डी
आणि अजून कानडीत
बालवाडीतही जात नाही!

            ...अरे ही तर कविता आहे! अगदी आतून आलेली. मी ताबडतोब सापडेल त्या कागदावर या तीन ओळी उतरून घेतल्या. ह्या तीन ओळी अजून लांबवून कविता मोठी करण्याची मला त्या वेळीही गरज वाटली नाही आणि आजही मी तसं करण्याचा प्रयत्न करत नाही. या तीन ओळी एकदम स्वयंभू वाटल्यात मला. कारण बडोदा ते म्हैसूर व्हाया कलकत्त्याचे प्रसंग. म्हैसूरला पंधरा दिवस भाषेसाठी माझी जी उलघाल होत होती, त्या जाणिवेला शब्दांच कोंदण मिळून नेमकी अभिव्यक्‍ती आविष्कृत झाली होती. क्‍तकानडीच्या ठिकाणी आपल्याला हवी ती भाषा घातली की हा अनुभव कोणासाठीही सार्वत्रिक होत होता.
            (नुकताच महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार मिळालेल्या व पुण्याच्या पद्मगंधा प्रका‍शनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ या माझ्या पुस्तकातील एक छोटेसे प्रकरण.)

डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/