मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

माणूस आणि एकलेपण





- डॉ. सुधीर रा. देवरे
           

      माणूस नात्यांमुळे एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. विवाहाचा समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, कमीतकमी वधूवरांचे दोन कुटुंबे आणि दोन मित्र तरी त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकून घेता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला नातेवाईक लागतात आणि दु:खाचे सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे नातेवाईक लागतात.
            माणूस या जगात एकटा असू शकेल का? म्हणजे तो विनासंबंध- विनापाश असू शकेल का? माणसाशी कोणतेही नातेसंबंध न ठेवता कोणी एखादा सुखात जगू शकेल का? तो दुसर्‍या माणसाशी कायम फटकून वागू शकतो का? एखादा माणूस माणूसघाना असू शकतो का? तो एकलकोंडा असू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येऊ शकतात, तरीही आपल्याला असे रोज कोणाबद्दल तरी ऐकायला येते, की अमूक एक माणूस एकलकोंडा आहे. अमूक एकाला एकटे राहणे आवडते. अमूक एक माणूस आजूबाजूच्या माणसांत न मिसळता आपल्याच कोषात कायम गर्क असतो. आपल्याकडे माणसं येणं त्याला आवडत नाही आणि इतर माणसांकडे जाणंही तो हेतुत: टाळत असतो. वगैरे.
            अतिपरिचयात अवज्ञा म्हणून एखादा माणूस शेजार्‍यापाजार्‍यांशी फटकून वागत असेल वा वेळप्रसंगी भांडतही असेल कदाचित, तरी तो माणसात मिसळणाराच असतो. एखादा माणूस माणसांच्या कळपात राहणे टाळत असला तरी तो आतून अनेक लोकांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असतो. अपरिचित माणसाशी सोबती करावी असेच त्याला मनातून वाटत असते. माणसाशी प्रत्यक्षात फटकून वागणारा माणूस हा आतून समाजाशी जुळवून घेणाराच असतो. कोणताही माणूस तमाम मानव समाजाविरूध्द जात नाही. समाजातील काही प्रवृत्तींविरूध्द तो बंड करू शकतो पण आख्या मानवजातीच्या विरोधात जाणारा माणूस अजून जगात जन्माला आला नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात एकटा मनुष्य राहणे म्हणूनच अशक्य घटना वाटते.
            आपला स्वत:चा स्वभाव विसरून आपण इतर लोक आणि त्यांचे स्वभाव हा नेहमी चर्चेचा विषय करतो. एखादा माणूस कसा एकलखुरा आहे, तो समाजापासून कसा फटकून वागतो, तो माणसात मिसळत नाही, समाजात मिसळत नाही, नातेवाईकांकडे जात येत नाही. विवाह, अंत्यविधी आदी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. अमूक हा आपण आणि आपले घर भले वा काम भले असा झापडे लावलेल्या विचारांचा माणूस आहे, अशा प्रकारचे कोणाबद्दलचे तरी वक्‍तव्य आपण कायम ऐकत आलो आहोत.
            माणूस हा निसर्गत:च समाजप्रिय प्राणी आहे, मग तो कोणताही माणूस असो. गरीब असो, श्रीमंत असो, आदिवासी ग्रामीण असो की शहरी सुशिक्षित असो. तो माणसाच्या कळपातच रमणारा आहे. कोणाकडे जात येत नसला तरी तो माणसांच्या वस्तीतच घर बांधतो. माणसाच्या गरजाच अशा आहेत की तो अंशत: का होईना परावलंबी आहे. पूर्णपणे स्वावलंबी नाही. त्याला कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे जावे लागेल तर डोक्याचे केस कापण्यासाठी न्हाव्याकडे जावे लागेल. तब्बेत तपासण्यासाठी डॉक्टरकडे जावे लागेल तर जेवण तयार करण्यासाठी बाजारात- दुकानात नाहीतर आयत्या जेवणासाठी हॉटेलीत तरी जावे लागेलच. कोणीही एकलखुरा माणूस जंगलात वा डोंगरात रहायला जात नाही. माणसांच्या गावात वा शहरातच तो वस्ती करतो. म्हणजे प्रत्यक्ष ओळखीत अथवा येता जाता कोणाशी गप्पा मारण्यात तो रमत नसला तरी आजूबाजूच्या माणसांचा कानोसा घेतच तो आपल्या कोषात आपले आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणून मानवी संबंधांचा विचार आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही एका टोकाचा न करता साधकबाधक तारतम्याने घ्यावा लागेल.
            खरं तर हा एकटे राहणार्‍या माणसाचा स्वत:चा दोष नसून तो दोष काही प्रमाणात आपल्यात म्हणजे या समाजात आहे. आपण एखाद्या माणसाला मुद्दाम एकटे करून सोडतो. आपली तार त्याच्याशी जुळत नाही म्हणून तो आपल्यापासून दूर जातोय असे न समजता आपण तो त्याचा मूळ स्वभावच आहे असे समजून चालतो. तो सामाजिक असूनही आपण त्याला समाजापासून वेगळे पाडतो. आपल्या आणि त्याच्या सवयी-  छंद- व्यसनेही भिन्न असल्यामुळे केवळ तो दूर राहतो. आपल्यापासून तो अंतर ठेऊन असतो याचा अर्थ तो आपला व्देष करतो- मत्सर करतो असा होत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे.
            एखादी मानसिक धक्का देणारी घटना घडून गेल्यामुळेही एखादा माणूस कायमचा एकलकोंडा होऊ शकतो. पण या मानसिक पातळीवरच्या गोष्टी आपल्याला अज्ञात असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल गैरसमज करत तो मनुष्य कसा माणूसघाना आहे याची सर्वांकडे चावळ करून हा समज आपल्या मनाशी पक्का करून टाकतो. आणि तसा समज आजूबाजूच्या समाजातही कसा अधिक दृढ होईल असा प्रचार करत राहतो. आपण स्वत:ला सामाजिक- सोशल समजत असूनही आपल्यात ही सामाजिक पर्यावरणासाठी सर्वात प्रदुषणीय बाब आहे. अगदी एकट्या राहणार्‍या माणसापेक्षा असा प्रचार करणारा माणूस समाजाला जास्त धोकादायक ठरतो.
            आपल्या मताने सर्व माणसांपासून अंतर ठेऊन असणार्‍या माणसाच्या घरात सर्वात जवळची पत्नी असते, (अंतर ठेऊन असणारी स्त्री असेल तर तिला सर्वात जवळचा पती असतो.) मुले- बाळे असतात, आई- वडील असतात. या सर्वांशी रोज त्या व्यक्‍तीचा अगदी जवळून संबंध येत असतो. आणि या संबंधांत जिव्हाळ्याचा लवलेशही नसेल असेही आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. प्रदर्शन करणे वेगळे आणि आतून प्रेम असणे वेगळे. म्हणजे त्या व्यक्‍तीची प्रेम अभिव्यक्‍तीची पध्दत आपल्यापेक्षा भिन्न असू शकते. पण तिच्या हृदयात प्रेमच नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्यापरीने ती व्यक्‍ती घरदार चालवत- कर्तव्य पार पाडत आपल्या प्रेमाची अभिव्यक्‍तीच करत असते.
            आता एकदम एकटा राहणार्‍या माणसाबद्दल बोलुया. म्हणजे एखाद्या घरात एक माणूस कायम एकटाच राहतो. त्याला पत्नी नाही, (व्यक्‍ती स्त्री असेल तर तिला पती नाही.) मुले- बाळे नाहीत वा कोणत्याही नातेवाईकांसोबत न राहणारा एकटा माणूस. कोणत्याही नात्याशी आपली तार न जुळल्यामुळे हा मनुष्य एकटा राहत असेल असे आपल्याला वाटत असले तरी, हा माणूस कदाचित विशिष्ट परिस्थितीमुळेही एकटा राहत असेल अशी शक्यता गृहीत धरावी लागतेच. तो एकटा राहतो म्हणून त्याला एकलकोंडा असेही म्हणता येणार नाही. तसेच जंगलात वा पर्वतांच्या गुहेत राहणारा एखादा बुवा- साधुही आपल्यासोबत शिष्यगण घेऊन वावरतो. म्हणून अशा लोकांनाही आपल्याला निर्णायकपणे माणूसघाना ठरवता येणार नाही.
            कोणी एखादा माणूस आपल्याशी फटकून वागतो म्हणून तो एकलखुरा असाही युक्‍तीवाद इथे कोणी करू शकेल. पण तो अमूक एकाशी वा एखाद्या मनुष्य गटाशी फटकून वागतो म्हणून तो पूर्ण समाजाच्या विरूध्द आहे असे मानणे सयुक्‍तीक होणार नाही. त्याच्या एखाद्या तात्विक गोष्टीच्या आड येणार्‍या घटनांमुळे तो तुमच्याशी तसे वागत असेल तर तो एकलकोंडा नसून त्याच्या तत्वाविरूध्द तुम्ही आहात, त्या प्रवृत्तींच्या विरूध्द तो आहे असे म्हणावे लागेल. पण कोणाच्या तात्विक भूमिकेची आपण नेहमीच अशी गल्लत करतो आणि एखाद्याच्या वैचारिक बैठकीला निकाली काढत राहतो.
            आयुष्यात एखादे ध्येय साध्य करण्यासाठी वा अभ्यास करण्यासाठी कोणी एखाद्या माणसाने- कलावंताने आपल्यावर एकटेपणा लादून घेतलेला असतो. घरात समाधी लावून- स्वत:ला कोंडून घेऊन तो कलाकृती निर्माण करीत असतो. कलाकृती पूर्ण झाल्यावर ती रसिकांसाठीच म्हणजे शेवटी समाजासाठीच उपलब्ध होणार असल्यामुळे अशा कलावंतालाही म्हणूनच एकलकोंडा वा समाजात न मिसळणारा म्हणता येणार नाही.
            माणूस ज्या समाजात जन्माला येतो. ज्या परिस्थितीत तो वाढतो. ज्या परिवेशात त्याचे बालपण जाते. ज्या सांस्कृतिक वातावरणात त्याची भावनिक व मानसिक जडण घडण होते, तिथल्या स्थानिक जीवन जाणिवा त्याच्या आख्या आयुष्यात आविष्कृत होत राहतात. मग तो माणसात मिसळो वा आपण म्हणतो तसा तो एकलखुरा असो. कोणाला असे एकलखुरा- एकलकोंडा ठरवणे ही समाजातील काही लोकांची हेतुत: कोती राजकीय खेळी असते. अशा समजामागे वास्तवात मुळीच तथ्य नसते. माणूस जन्मताच अनेक धाग्यादोर्‍यांच्या संबंधात येऊन पडतो. आपली नाळ जशी त्याला कधी विसरता येत नाही, तसे हे नाते- संबंध त्याला नाकारता येत नाहीत. पुढे आयुष्यात जे औपचारिक- अनौपचारिक नाते होत जातात- जोडले जातात, ते ही त्याला कधीच समूळ उपटून फेकता येत नाहीत, काही लोक गर्दीत असूनही कायम एकटेपणा सोसत असतात आतून. कायम घाबरलेले असतात ते. परिस्थितीचा दबाव येतो. मानसिकता आकुंचन पावते. ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून मानवी संबंध आणि सामाजिकता ह्या संज्ञा फार जपून हाताळल्या पाहिजेत. नाहीतरी समाजात बहुमताने रूढ होणार्‍या सर्वच वाईट गोष्टींना आपण मान्यता देऊ आणि अल्पमतात असलेल्या चांगल्या गोष्टींना सोडचिठ्ठी देत राहू.
            (पुण्याच्या अक्षरवेध दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

भाषांची स्थिती आणि परिस्थिती


 
-         डॉ. सुधीर रा. देवरे

      (साडेपाच वर्षातून पहिल्यांदा एक ब्लॉग वेळेवर ठरलेल्या दिवशी देता आला नाही. 15-10-2017 पासूनचा पंधरवाडा खाडा गेला.)

      जगात़ी सर्व भाषांची संख्या अमूक इतक़ी आहे असे काटेकोर सांगता येणार नसले तरी ती सुमारे 7000 इतकी आहे असा अंदाज वर्तवता येतो. जगातील भाषांपैकी अर्ध्याअधिक भाषा जेमतेम 2500 लोकांपेक्षा कमी लोक बोलतात. अंदमान- निकोबार बेटांवरील ओंगे आणि जारवा जमातीतील लोक तर शंभरांपेक्षाही कमी आहेत. 2050 पर्यंत जगातील निम्म्यापेक्षा अधिक भाषा समूळ मृतप्राय होतील. त्यातील बर्‍याच भाषा आजच मृत्यूपंथाला लागल्या आहेत.
      अमेरिकेत १९५१ साली रिचर्ड पिटमन यांनी जगातील भाषांचा कॅटलॉग तयार केला. तो अजूनही एश्नॉलॉगया नावाने दर चार वर्षांनी प्रकाशित होतो. २००४ साली प्रकाशित झालेल्या आवृत्तीत जगातील भाषांची संख्या ६९१२ अशी नोंदली गेली आहे. दर चार वषानी या कॅटलॉगमध्ये नव्याने उजेडात आलेल्या भाषांची नोंद होते. भाषांची संख्या एकीकडे वाढताना दिसत असली तरी मृत्यू पावलेल्या भाषांची संख्याही नमूद केलेली आहे. १९९६ ते २००० या काळात ४१४ भाषा मृत झाल्यात तर २००० ते २००४ या काळात ४९५ भाषा मृत्यू पावलेल्या आहेत. दर पंधरा दिवसांच्या काळात एक भाषा मृत्यू पावत असते, असा यातून अनुमान काढता येतो. या कॅटलॉगवरून एक गोष्ट लक्षात येते की, जगात एकूण किती भाषा होत्या वा आहेत हे अजून ठरायचे आहे.
      १९६१ सालच्या जनगणननेनुसार भारतात़ील बालींची संख्या १६५२ इतकी मोजली गेली. मात्र ह़ी संख्या नेमकी नाह़ी. भारतात़ील बोली व भाषा यांची एकूण संख्या अंदाजे १८00 इतक़ी असाव़ी. भारतातील आदिवासी भाषांची संख्या १८० इतक़ी सांगितली जाते. मात्र हे सर्व आकडे काटेकोर नाहीत.
      सर जॉर्ज ग्रियर्सन (१८५१-१९४६) यांनी प्रथमतः भारतीय भाषांचा सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. A Linguistic Survery of Indiaया नावाने तो खंडशः प्रसिद्ध आहे. पण हा प्रथम प्रयत्न असल्याने व त्यांच्याजवळ साधनांचा तुटवडा असल्यामुळे काही भाषांचे वर्गीकरण चुकीचे झाल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ, अहिराणी भाषेचे वर्गीकरण ग्रियर्सन यांनी भिल्ली भाषेत केले आहे. वस्तुतः अहिराणी बहुजन समाजाची लोकभाषा आह.
      भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. संविधानानुसार अठरा भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता असली तरी इतर सर्व बोली व त्या बोलणार्‍यांचे अस्तित्व मान्य केले आहे.
      १९६१ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बोलींची संख्या ६५ इतकी आहे. मात्र ही संख्या ७५ च्या पुढे जाऊ शकते. कोकणीच्या सुमारे २० बोली आढळतात. अहिराणीत जवळ जवळ २१ बोलीभाषा आढळतात. या सर्व बोलींवर अहिराणीचा पगडा जाणवतो. वरील सर्व आकडे काटेकोर नसून सर्वसाधारण आहेत. महाराष्ट्रात ४७ आदिवासी जमाती असून त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषा आहेत. २५ टक्के आदिवासी भाषा मराठीला जवळच्या बोलीभाषा आहेत. त्या मराठी माणसाला ऐकून समजतात. खरं तर सर्व प्रकारच्या बोली या स्वतंत्र भाषाच आहेत. बोली व भाषा हे वर्गीकरण योग्य नव्हे. डांगी, पावरी, राठवी, वंजारी, वडारी, गोंडी, कोरकू, कोलामी, बंजारा, मथवाडी, झाडी, ठाकरांची खिवारी या बोली सर्वसामान्य मराठी माणसाला समजायला अवघड वाटतात.
      एका भाषेच्या संपर्कात येणार्‍या भाषेत देवाण-घेवाण होत राहते. शब्दांची सरमिसळ होत राहते; पण भाषा स्वतंत्र असते. विश्वनाथ खैरे म्हणतात, ‘‘मानवाचे गट पुंजक्यांनी राहात होते. म्हणून जितके गट तितक्या अगणित बोली जगात नांदत होत्या.’’
       महाराष्ट्रातील बहुजनांच्या बोली व आदिवासींच्या बोली यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे.
बहुजनांच्या बोली : अहिराणी, माणदेशी, मराठवाडी, कोकणी, वर्‍हाडी, वैदर्भी, सातारी, पुणेरी (सदाशिव पेठी), दखणी, आगरी, भंडारी, दक्षिण कोकणी, उत्तर कोकणी, घाटी, मावळी, संगमेश्वरी, कुणबी, चित्पावणी, कुडाऴी रायपुरी, गुर्जर, लाडशिक्की, लेवापाटीदार, गुजरी, बडगुजरी, कोल्हापुरी, नेमाडी, मालवणी, भावसारी.
आदिवासी बोली : कोकणा, घाट कोकणी, डांगी, वारली, काटोनी, पावरी, राठवी, तडवी, पाडवी, वळवी, माची वंजारी (बंजारा), वडारी, चांभारी, महाराऊ, भिलोरी (भिल्ली), ठाकरी (खिवारी), कातकरी, गोंडी, कोरकू, कोलामी, कुटुबी, हळबी, कामारी, कटिया, कटकारी, करहंडी, मिरगानी, बाणकोटी, दमणी, धनगरी, कोळी, मथवाडी, झाडी, डांगणी, पारुषी (राजपूत भाटकाडागुरी, मांग-अंबुनी), गोलेवार.
      बहुजन लोकांच्या बर्‍याच बोली आज मृत्युपंथाला लागल्या आहेत. आपल्याला कोणी गावंढळ, खेडूत, मागासलेला म्हणू नये म्हणून आपल्या बोली न बोलता प्रमाण मराठी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांना आपल्या बोलींपासून अगदी ठरवून लांब ठेवले जाते. ती भाषाच काय पण बोलीतला एखादा शब्द लहान मुलांच्या जिभेवर आला तरी त्याला घरातूनच खडसावले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या अहिराणी भाषक कुटुंबात लहान मूल मराठी बोलत असले तरी त्याच्या जिभेवर एखादा अहिराणी शब्द सहज येऊन जातो. आई, माझ्या बोटाला रंगत निघाले बघ.हे वाक्य ऐकून आईला मुलाच्या बोटाला झालेल्या जखमेपेक्षा त्याच्या भाषेची काळजी जास्त वाटते. म्हणून आई मुलाला लगेच उपदेश करते, ‘रंगत नाही म्हणू. रक्‍त म्हणायचेअशा शिकवणुकीने पुढची पिढी बोलीभाषेपासून नुसती लांबच नाही जात तर ते आपली बोलीच हरवून बसणार आहेत. आता बोलीभाषा बोलणारे लोकही आपल्या दैनंदिन व्यवहारात अस्सल बोलीतल्या शब्दांपेक्षा प्रमाण मराठी भाषेतले वा इंग्रजीतले शब्द जास्त प्रमाणात वापरू लागलेत. अशा पद्धतीने बोली भाषेतले शब्द - अस्सल शब्द आधी मरतात आणि त्यांच्या पाठोपाठ बोलीभाषाही. उदाहरणार्थ, मूळ अहिराणी भाषेतलं वाक्य असं असतं, ‘‘तू कथा गयथा?’’ मात्र अलीकडे अहिराणी सोपी बोलली जाते. आता प्रश्न विचारला जातो, ‘‘तू कुठे गयथा?’’ अहिराणीतल्या कथाशब्द हळूहळू वापरेनासा होऊ लागला. कथाच्या जागी प्रमाण मराठीतला कुठेआल्लाद येऊन बसला. असे असंख्य उदाहरणे देता येतील.
      इंग्रजीचे प्रमाणही बोलीत असेच वाढते आहे. मूळ अहिराणी वाक्य : ‘‘मन्ही येरले झीळ फुटनात.’’ पण आता वाक्य ऐकू येतं. ‘‘मन्ही येरमा परक्युलेशन व्हयी र्‍हायनं’’ झीळच्या जागी सहज इंग्रजी परक्युलेशन शब्द येऊन बसला.
      भाषा मृत होऊ देणे म्हणजे लोकपरंपरांना मूठमाती देणे. आपल्या परंपरा आणि भाषा जाणूनबुजून मारणे. आपल्या स्वाभिमानाचा मृत्यू घडवून आणणे. If you kill the language you kill the nation! आपली बोलीभाषा जिवंत ठेवत इतर सर्व भाषांचा आदर राखणे - सन्मान करणे म्हणजेच जगा व जगू द्या सूत्र अंगीकारणे. परस्पर भाषांचा आदर करत माणसं जोडली जातात. प्रांत जोडले जातात. देश जोडले जातात. जग जोडले जाते. भाषेचा अभ्यास जग जोडण्यासाठी आहे. तोडण्यासाठी मुळीच नाही. दुसर्‍या भाषेला मनाई करून आपली भाषा वाढवता येत नाही. दुसर्‍या भाषेचा आदर करत वाढवता येते. भाषेबद्दल आपपर भाव ठेवणे घातक होऊ शकते. स्वभाषा जिवंत ठेवायची असेल तर दुसर्‍या भाषेचं नैसर्गिक जगणंही मान्य करावं लागेल.
      (पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ या पुस्तकातून साभार. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

बोली आणि भाषा





-         डॉ. सुधीर रा. देवरे

      बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही. आज अस्तित्वात असलेल्या बोली या सुद्धा यापुढे आपण जागरूक राहिलो नाहीत तर कालांतराने नामशेष होणार आहेत. तसे होऊ द्यायचे नसेल तर आज आपल्याला माहीत असलेल्या बोलींचे (त्यांच्यासाठी कोणतीही लिपी उपलब्ध नसली तरी) माहीत असलेल्या लिपीत आपण लिहून ठेवल्या पाहिजेत. मग या बोली कोणत्याही असोत. झाडी बोली असो, मालवणी असो की कोकणी असो. या भाषा ज्या भाषेच्या घटकबोली ठरतात, त्या उपलब्ध लिपीत त्या लिहून ठेवल्या पाहिजेत. आता उल्लेख केलेल्या भाषा देवनागरी लिपीत आपण शब्दबद्ध करून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे काळाच्या ओघात त्यांच्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाला तरी तिचे स्वरूप अशा दस्तऐवजीकरणातून भाषाभ्यासकांना उपलब्ध होऊ शकेल. अशा दस्तऐवजीकरणाचे काम ढोल आणि भाषा लोकसर्वेक्षण या प्रकल्पातून होत आहे.
      बोलली जाणारी बोली आणि लिखाण, ज्ञान व व्यवहार यांसाठी वापरली जाणारी ती भाषा असे आपण भाषांचे वर्गीकरण करणे चुकीचे आहे. कारण प्रमाणभाषा ह्या कृत्रिम व अपुर्‍या ठरतात तर बोली याच मूळ उत्स्फूर्त भाषा ठरतात. सर्व घटक बोली गटांना समजेल अशी प्रमाणभाषा आपोआप रूढ होत असते, ती बोलींच्या खांद्यावर उभे राहून. प्रमाणभाषा ह्या बोलींकडूनच भाषिक सामर्थ्य घेऊन प्रवाहित होत असतात. प्रमाणभाषेतील बहुतांश शब्दही बोलींकडून उचललेले असतात. तरीही प्रमाणभाषा बोलणारे लोक बोलीभाषांना ग्राम्य, अशुद्ध व कमी प्रतीची म्हणून हेटाळणी करतात. प्रमाणभाषांचा उगम बोलींमधून होत आला आहे, हे सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आले तर असे होणार नाही. उदाहरणार्थ, मराठीच्या घटक बोली म्हणून अहिराणी, वैदर्भी, कोकणी, सातारी, मालवणी, नगरी, कोल्हापूरी अशा बोली बोलणार्‍या अडाणी लोकांना प्रमाण मराठी समजते, पण प्रमाण मराठी बोलणार्‍या सुशिक्षित लोकांना या बोली काही प्रमाणात समजत नाहीत. यावरून हा मुद्दा लक्षात येईल.
      जी प्रमाणभाषा आपल्या घटक बोलींचे शब्द जास्तीतजास्त प्रमाणात उपयोजित करते, ती भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत राहते. उलट जी भाषा आपल्या तथाकथित शद्धुत्वाच्या नावाखाल़ी सावळे पाळायला लागते ती लवकर मृत होते. याचे ठळक उदाहरण म्हणजे संस्कृत भाषा. संस्कृत भाषेत प्रचंड प्रमाणात ग्रंथ लिखाण झालेत. दोन जागतिक महाकाव्य -रामायणमहाभारतसंस्कृत भाषेत असूनही या भाषेने, म्हणजे ही भाषा ज्या मूठभर लोकांच्या हाती होती, त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपली कवाडे बंद करून घेतली. तत्कालीन विशिष्ट वर्गाने संस्कृत वाचायलाही सामान्य लोकांवर बंदी घातली. यामुळे लवकरच संस्कृत भाषा मृत झाली. हे उदाहरण समोर ठेवून भाषिक अस्मिता आपण तारतम्याने वापरायला हवी. आम्ही बोलतो वा लिहितो तेवढीच भाषा शुद्ध आणि इतर बोलतात वा लिहितात ती ग्राम्य असे होता कामा नये. म्हणून आपण बोलींसह सगळ्याच भाषांचा आदर करूया. मग ती भाषा अहिराणी असेल, गोंडी असेल, पारधी असेल, कोकणा असेल, झाडी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराथी असेल. इग्रंज़ी ही परकीय भाषा असली तरी आपण तिचा आदर करूया. आपल्या मायबालीच्या प्रेमाखातर आपण कोणत्याही दुसर्‍या भाषेचा दुस्वास करता कामा नये. भाषा ही माणसं जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. भाषा-प्रेमाने माणसं तुटत असतील तर आपण आपल्या भाषेवर आंधळं प्रेम करतो, असं म्हणावं लागेल. आपल्या भाषेवर प्रेम करताना दुसर्‍या भाषेचा द्वेष होता कामा नये. दुसर्‍या भाषेलाही अगत्याने समजून घेणे गरजेचे आहे. भाषा आपण अशा जोडत गेलो तर माणसंही आपोआप जोडली जातात.
      सारांश, भाषा मरायला नकोत यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे. कारण भाषेत त्या त्या भौगोलिक परिसरातील लोकसंस्कृती सखोल मुरलेली असते. भाषांच्या माध्यमातून सांस्कृतिक ओळख होत असते. कोणत्याही भाषेत ग्रामीणत्व, अशुद्ध, अश्लीलता असे काहीही नसते. भाषेतील ह्या संकल्पना सापेक्ष असतात. शहरी माणसाच्या दृष्टिकोनातून एखादा शब्द ग्राम्य वा अश्लील ठरत असेल तर ग्रामीण लोकांच्या दृष्टिकोनातून तो दैनंदिन नैसर्गिक व्यवहार ठरू शकतो.
      (पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ या पुस्तकातून साभार. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
(दिनांक: 01 9 -2017)