Dr sudhir Deore

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

गावाची रचना




-   डॉ. सुधीर रा. देवरे

          कोणत्याही गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावांतील घरांची रचनाच अशी असायची की घराच्या पुढच्या दारातून गावात प्रवेश व्हायचा तर मागच्या दारातून गावाबाहेर मळ्यात- खळ्यात वा प्रात:र्विधींसाठी जाता येत असे. या व्यतिरिक्‍त गावाला कुठे कुठे‍ खिंडी असत. या खिंडींमधून पांदीने शेतात बैलगाडीतून जाता येत असे. गावात येणार्‍या व्यक्‍तीला गावाच्या मुख्य दरवाजातूनच गावात प्रवेश करावा लागे. आणि गावाबाहेर जाण्यासाठी सुध्दा.
          गावाची शीव वेगळी आणि दरजा वेगळा. गावातून बाहेर पडूनही काही अंतरावर गावाची शीव संपते. दरजा मात्र गावाला लागूनच- खेटूनच असे. गावाचा दरजा (दरवाजा) रात्री बंद करून दुसर्‍या दिवशी सकाळी उघडला जायचा. गावाच्या बाहेर असं म्हणायचं झालं तर लोक ‘दर्जा बाहेर’ असं म्हणायचे. उदाहरणार्थ, ‘दर्जाबाहेर गारूडीना खेळ इयेल शे’ असा उल्लेख होई. गावाच्या या दरवाजाला ‘देवडी’ असंही म्हटलं जायचं.
          प्रत्येक गावाला ‘पांढरी’ आणि ‘काळी’ नावाची जमीन असायची. गाव वसलेल्या आणि आजूबाजूच्या जमिनीला ‘पांढरी’ म्हणायचे, तर गावाच्या चहू बाजूला असलेल्या गावातल्या लोकांच्या मालकीच्या शेतीला ‘काळी’ म्हटलं जायचं. (चहू ऐवजी खरं तर गावाच्या तीन बाजूला असं म्हटलं पाहिजे. कारण गावाच्या चौथ्या बाजूला शक्यतो नदी वहायची. आणि नदी हीच गावाची त्या बाजूची वेस ठरायची. अर्थात काही गावांची वेस अजूनही नदीच ठरवते.) गावाची काळी म्हणजे शेत जमीनीची हद्द संपली की दुसर्‍या शेजारच्या गावाची वेस सुरू व्हायची.
          आता ग्रामीण भागातल्या कोणत्याच गावाला दर्जा असल्याचं दिसून येत नाही. काही गावांना या दर्जाचे भग्न अवशेष मात्र दिसून येतात. मूळ मुख्य गाव सोडून आता अनेक गावं आडवी- उभी गावाबाहेर वाढली आहेत. अनेक गावातल्या घरांसह रस्त्यांचंही काँक्रेटीकरण सर्वदूर झालेलं दिसेल. शेतीची काळी जमीनही आज नव्या इमारतींखाली दाबली जात आहे.
          मात्र पूर्वी असं नव्हतं. गावाला वळसा घातलेल्या कोट भिंतीच्या आत आक्ख गाव गुण्यागोविंदाने नांदायचं. गावातंर्गत अनेक गल्ल्या, वाडे असायचे. कुणबी गल्ली, माळी गल्ली, तेली गल्ली, वाणी गल्ली, धनगर गल्ली, तांबट गल्ली, सोनार गल्ली, पेठ गल्ली, तांबोळी आळी, मधली होळी, भोपळा चौक, चावडी, सुतार वाडा, कुंभार वाडा, लोहार वाडा, खालची आळी, वरची आळी, भिलाटी अशी अनेक नावं राजरोज उच्चारली जात. पोस्टकार्डवर पत्ता म्हणून लिहिले जात. कारण या गल्ल्या- वाड्यांची नावं आज जातीयवादी दिसत असली तरी तशी ती जातीयवादी नव्हती. या गल्लींची नावं सामान्य नावं झाली होती. म्हणून या गल्ल्या- वाड्यांची नावंही कुजबुजत न घेता सार्वजनिकरित्या घेतली जायची. त्यात कोणाला काही वावगं वाटायचं नाही. आपापले भाऊबंद, जातबांधव मिळून एकत्र वस्ती करणे गैर नव्हतं. गावात जाती होत्या पण जातीयता नव्हती. गावातल्या सर्व गल्ल्या आणि वाडे एकमेकांना जोडण्यासाठी काही बोळ असत. बोळीने या गल्लीतून त्या गल्लीत जाता येत असे. मात्र काही बांधव गावापासून थोडं अंतर राखून स्वतंत्र वस्ती करून रहायचे. पारंपरिक चुकीच्या समजूतीमुळे काही लोकांना कमी दर्जाचं समजलं जाई. ते योग्य नव्हतं. ती दरी आज बुजली गेली. 
          गावात तेली आपली तेलाची घाणी चालवायचा. कुंभार वाड्यात फिरत्या चाकावर मडके बनवताना दिसत. सुतार चौकात करवत- हातोडी तर लोहार चौकात धामण- घणांचे आवाज ऐकू येत. शिंप्याच्या दारासमोरून जाताना शिवण्याच्या मशिनचा आवाज ऐकू यायचा. सोनाराची‍ पिटी पिटी सुरू असायची. या सगळ्या प्रकारच्या आवाजांमुळे गाव जीवंत वाटायचं. गावात दिवसभर सर्वत्र नवीन निर्मिती प्रक्रिया सुरू असायची.
          आता गावात सर्वत्र शांतता असते. चावडीवर वा पिंपळाच्या पारावर असलीच तर वयोवृध्द माणसांची वर्दळ असते. अथवा तरूणांचा घोळका टाइमपास करत मोबाईल चमकावत दिसतो. गावातल्या बारा बलुतेदारांचे- कारूनारूंचे पारंपरिक काम आता नव्या शोधांमुळे ठप्प झालेलं आहे. पण नव्याचं स्वागत करत आपली प्रगती प्रत्येकाने करून घेतली पाहिजे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

   – डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
द्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:३५ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

लक्ष्मी येण्याची वेळ


- डॉ. सुधीर रा. देवरे

      संध्याकाळी बाहेर ओट्यावर उभा होतो. घराच्या आजूबाजूला मी खूप झाडी लावून ठेवल्यामुळे संध्याकाळी बाहेर डास असतात. हे डास- मच्‍छर संध्याकाळी जास्त प्रमाणात दिसून येतात. दारं खिडक्या उघड्या दिसल्या की ते घरात प्रवेश करतात आणि रात्रभर आपल्याला डंख मारत राहतात. बाहेर ओट्यावर येताच डास घरात येऊ नयेत म्हणून मी बाहेरून घराचं दार घट्टपणे लावून घेतलं. आत डास जाण्यासाठी थोडीही फट राहू नये अशी काळजी घेत मी बाहेरून दाराची कडी लावली. आणि अचानक मला बालपण आठवलं. गावात लहानपणी संध्याकाळी माझ्याकडून चुकून दार लावलं गेलं तर आई म्हणायची, ‘लक्षमी येवानी येळ जयी, दार कसाले लावस रे भाऊ? उघडं ठेव.’ मला हा उद्‍गार आत्ताच ऐकू आल्यासारखा मी चपापलो. आपण शहरात आल्यापासून लक्ष्‍मी यायची वेळ, दिवाबत्तीची वेळ विसरून गेलो आहोत. बटन दाबलं की विजेचा भसकन पांढराशुभ्र उजेड घरभर पसरतो. घरात डास येऊ नयेत म्हणून दिवसभर दार उघडं असलं तरी संध्याकाळी आपण न चुकता दार व्यवस्थित बंद करतो.
     संध्याकाळ झाली आणि कोणी आपल्या घराचं दार लावायला लागलं की लहानपणी वडीलधारी मंडळी पोरासोरांवर खेकचायची, ‘राहू देत नी रे कवाड उघडं. आता लक्षमी येवानी येळ जयी आनि तू कवाड आघे करी र्‍हायना. सांज जई का दार लाऊ नही भाऊ.’
     सायंकाळी घरात लक्ष्मी येते. गावातल्या प्रत्येक घरात लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे धन, दौलत, बरकत वगैरे हे ही वडीलधार्‍यांकडूनच समजलेलं. घरात हे सर्व सुख येण्यासाठी घराची दारं संध्याकाळी उघडी असली पाहिजेत. शेतकाम व अन्य कामासाठी ग्रामीण लोकांना दिवसभर घराबाहेर रहावं लागत असल्यानं घराचं दार दिवसभर बंद ठेवलं तरी चालतं. फक्‍त संध्याकाळी लावू नये. दिवाबत्तीच्या वेळी घराची दारं उघडी ठेवावीत. हो, दिवाबत्तीच्या वेळी. खेडोपाडी आधी विजेचे दिवे नव्हते. कंदील आणि चिमणी नावाचे लहान दिवे असत. त्यांच्या काचा रोज संध्याकाळी चुलीतल्या राखेने घासून एखाद्या फडक्याने स्वच्छ पुसली जात आणि मग चिपडं पडताच, म्हणजे दिवस जाताच घरोघरी हे दिवे लावले जात. अशा संध्याकाळच्या वेळेला ‘दिवाबत्तीची वेळ’ झाली असं म्हणत. या वेळी घराची दारं उघडी असायला हवीत, अशी अलिखित पुर्वपरंपरेने चालत आलेली आचार संहिता होती. गावात ज्या ज्या घरात माणसं वास्तव्याला असायची (काही लोक मळ्यात रहात म्हणून त्यांच्या घराला कायम कुलूप असायचं.) त्या त्या घराची दारं संध्याकाळी उघडी ठेवली जात. कारण ही वेळ लक्ष्‍मी यायची वेळ असायची.
     विचार करताना अशा लक्ष्मी येण्याच्या समजूतीमागे काही शास्त्रीय आधार असावा का, मनात शंका आली. आणि विचारांना योग्य दिशा मिळताच लख्खपणे जाणवलं, असलाच पाहिजे. हा शास्त्रीय आधार कोणता असावा हे शोधण्यातही खूप वेळ गेला नाही. लक्ष्मी म्हणजे काय असू शकतं, हे तर्काने ठरवता आलं. म्हणूनच या समजुतीला शास्त्रीय आधार असल्याचं लक्षात आलं.
     : माझ्या घराभोवती मी इतकी दाटीवाटीने झाडी लावून ठेवलीत. ही सर्व झाडं आता रात्री प्राणवायू घेणं सुरू करतील आणि कार्बन डॉय ऑक्साइड सोडतील. संध्याकाळ पासून सकाळ होईपर्यंत हे सुरू राहील. म्हणजे झाडं रात्री माणसासारखाच प्राणवायूचा श्वास घेऊन कार्बन बाहेर सोडणार. मग आपण संध्याकाळी दारं- खिडक्या उघडी ठेऊन झाडांकडून मिळणारा संध्याकाळपर्यंतचा प्राणवायू घरात साठवून ठेवायला नको का? हा बाहेरचा प्राणवायू घरात भरून ठेवायला हवा. म्हणजे रात्रभर आपल्याला प्राणवायू पुरेल. कमी पडणार नाही. संध्याकाळी आपण लवकर दारं खिडक्या बंद करून ठेवल्या तर घरातला प्राणवायू सकाळपर्यंत आपल्याला कमी पडू शकतो. घरातल्या हवेत कार्बन डॉय ऑक्साइडचं प्रमाण वाढेल. म्हणून अंधार पडेपर्यंत आपण संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवलीत तर आपल्याला रात्रभर पुरेल इतका प्राणवायू घरात साठवला जाऊ शकतो. पूर्वी ग्रामीण घरांना खिडक्या क्वचितच दिसायच्या. कुठे एखाद्या घराला खिडक्या दिसल्या तरी त्या शास्त्रशुध्द पध्दतीने समोरासमोर नसायच्या. ग्रामीण घरात पुढच्या दाराला लागूनच थोड्या अंतरावर एक खिडकी असायची. बहुतेक ग्रामीण घरे एक दारी असायची. काहींना मागचं दार आणि पुढचं दार अशी दोन दारं असली तरी आजूबाजूला खिडकी नसायची. कारण घराच्या दोन्ही बाजूंना लागून घरे असत. अशा घरात रात्रीच नव्हे तर दिवसाही हवा खेळती राहत नसे. म्हणून संध्याकाळी बाहेरची हवा घरात घेणं आवश्यक होतं. (कंदील- चिमणी ह्या दिव्यांना ज्वलनासाठीही प्राणवायू लागतो. म्हणजे आतापेक्षा पेटवलेल्या दिव्यांच्या काळात गावातल्या घरात रात्री प्राणवायू जास्त लागायचा.) आपल्याला जिवंत ठेवणारा प्राणवायू, म्हणजेच लक्ष्मी असं तर म्हणायचं नसेल आपल्या पुर्वजांना?
     लहानपणी आमच्या गावात भरपूर झाडी होती. प्रत्येक खेड्यात भरपूर झाडी असायची. म्हणून अशा प्राणवायू साठवणुकीसाठीच लोक संध्याकाळी घराची दारं उघडी ठेवत असतील. आणि याचं शास्त्रीय भान आकलनापलीकडे असल्यामुळे प्राणवायू भरण प्रक्रियेला ‘लक्ष्मी’ नाव ठेवलं गेलं असावं का? ही तार्कीक कल्पना असली तरी या कार्यकारण भावात तथ्य दिसून येतं. पुरेशा प्राणवायूमुळे रात्रभर घरात नेगेटीव्ह एनर्जी निर्माण होत नाही. अजून काय हवं. हीच तर लक्ष्मी. (आणि अशी लक्ष्मी घरात खेळती राहण्यासाठी घराच्या आजूबाजूला जितकी झाडं लावणं शक्य असेल तितकी लावली पाहिजेत.) पैसा, अडका, बरकत, दौलत नावाची लक्ष्मी तर आपण कष्ट करून कमवतच असतो रोज.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  – डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/





द्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ५:३६ AM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

नदी आणि गाव



 
-    डॉ. सुधीर रा. देवरे

     गाव तिथं नदी होतीच. आजही ज्या गावाला नदी नाही असे फार क्वचित गावं असतील. गाव तिथं नदी नव्हती, तर जिथं नदी होती तिथं गावं वसली. नदीच्या काठांवर लोकवस्ती झाली. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. जिथं जिथं पाणी होतं त्या पाणवठ्यांच्या काठांवर गावं वसली. म्हणून कोणतं गाव कोणत्या नदीच्या काठावर हे अजूनही मुद्दाम विचारलं जातं. अथवा कोणत्या गावाजवळून कोणती नदी वाहते याचीही उत्सुकता असते. जरी अनेक नद्या वाहता वाहता आज आटून गेल्या आहेत.
     नदी लहान असो की मोठी. आज वाहत असो की नसो. आजची गावंही नदीच्या‍ किनारीच सापडतात. जीवन देणारी नदी ही माणसाची देवता आहे. नदीला माता समजलं जातं. परंपरेने नद्या पुजल्या जातात. नदीत अनेक देवता आजही पहायला मिळतात. नदी ही स्त्रिलींगी असल्याने नदीतल्या बहुतांश देवता या महिला देवता आहेत. आसरा ह्या देवता नदीतच अस्तित्वास असतात. प्रत्येक गावाच्या आसरा ह्या नदीतच वास्तव्य करतात. त्यांचं नावही आसरा. गावाला आसरा देणार्‍या नदीतल्या देवता त्या आसरा. आसरांना बोली भाषेत आया म्हणतात. नदी आपली आई. आईचे अनेक वचन आया. नद्या ह्या सर्व प्राणीमात्रांच्या आया आहेत.
     नदीतल्या आसरांसमोर आजही ग्रामीण भागात लहान बाळाला घुगरवलं जातं. घुगरावणं म्हणजे नदीतल्या आसरांसमोर मानवी बाळाने नतमस्तक होणं. त्याच्या पुढील आयुष्यासाठी या आसरा देवतांचा (आयांचा) आशीर्वाद घेणं म्हणजे घुगरावणं. जन्म झाल्यावर बाळाला जसं नदीचं दर्शन घडवलं जातं, तसं माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व‍ क्रियाकर्मही नदीतच वा नदीच्या काठांवर केले जातात. माणसाच्या अंत्ययात्रेचं वित्सर्जन नदीत होतं. माणसाची राख नदीच्या पाण्यात सोडली जाते. अस्थी नदीत बुडवल्या जातात. म्हणून उतारवयातल्या माणसाला मुद्दाम हिणवण्यासाठी ‘तुझ्या नदीत गोवर्‍या गेल्या तरी अक्कल आली नाही’ असं म्हटलं जातं. लोकप्रथा आपण समजतो इतक्या अडाणी नसतात. लोकप्रथांत आदिम लोकसमज आणि लोक सजगता दडलेली असते. हे लोकसमज जगण्याला बळ देतात. आत्मशक्‍ती वाढवतात. पूर्वी माणसाची आत्मशक्ती वाढवण्याचं काम अशा लोकप्रथा करत होत्या.
     लहानपणी साथ देणारी नदी आपल्याला आयुष्यभर प्रवाहीत करीत असते. ग्रामीण नदी जी आज वाहत नसली तरी केवळ तीस- पस्तीस वर्षापूर्वीच्या छोट्या छोट्या नद्याही सुजलाम सुफलाम होत्या. आतापर्यंत सगळ्याच माणसांचं बालपण या नद्यांच्या कडेवर पोसलं जात होतं. (या पुढच्या पिढ्यांना कदाचित ‘पूर्वी इथून नदी वाहत होती’ असं सांगावं लागेल.) नदीच्या दोन्ही थड्यांवर दाट आंबराई असायची. आंबराई दाट नसली तरी नदीच्या काठांवर अनेक झाडी असायची. नदी दोन्ही पात्रे भरून वहायचीच असं नाही. नदी छोटी असली तरी एका धारेने वाहताना दिसायची.
     काही लोक उन्हाळ्यात नदीत डांगरवाड्या तयार करत. डांगरवाडीत डांगरे, टरबुज, पानकाकड्या पिकायच्या. इतक्या कमी पाण्यातही काही मासेमारी करणारे लोक बारके बारके मासे पकडायचे. खडकांच्या खाचेतून खेकडे पकडायचे. लहान मुलं टोंगळ्याइतक्या वाहणार्‍या नदीच्या धारेत अंघोळ करायचे. थंडगार पाण्यात अंघोळ होताच तापल्या वाळूत अंग शेकायचं- वाळवायचं. आंब्याला लगडलेल्या कैर्‍या दगड मारून पाडायच्या. त्या तिथल्यातिथं खायच्या. वाळूत झरा तयार करून गढूळ पाणी उपसून झाल्यावर नितळ थंडगार पाणी हाताच्या ओंजळीने घटाघटा प्यायचं.
     नदीत बकरके बकर्‍यांना पाणी प्यायला आणायचे. गुराखी गायींना पाण्यावर आणायचे. शेतकरी आपल्या बैलांसह पाळीव प्राण्यांना पाणी पिण्यासाठी नदीवर आणायचे. गावात काही लोक बदकं पाळायचे. ते बदकं पाण्यात पोहण्यासाठी नदीत आणले जात. काही लोक केतकी नावाची वनस्पती नदीच्या धारेत भिजवत ठेवत. नंतर त्याचे लांब धागे काढून त्याचा दोर (आवते)‍ विनत. ही सगळी गंमत पाहण्यासाठी गावातली लहान मुलंही नदीत येत.
     घरोघरच्या गृहीणी धुणं धुण्यासाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी नदीवर येत. नदीत कपडे धुवून होताच ते तापलेल्या वाळूवर वाळत घालत. वाळलेल्या कपड्यांच्या नदीतच घड्या करून कढईत ठेऊन ती कपड्यांची कढई डोक्यावर धरून घरी आणली जायची. डोक्यावर कपड्यांची पाटी घेत नदीकडे धुणं धुण्यासाठी जाणार्‍या महिला आणि नदीकडून कपडे धुवून गावात येणार्‍या महिला हे रोज दिसणारं ग्रामीण दृश्य रमणीय असायचं. मठमुंगाचे वडे असले तर दाळा धुवायला गावातल्या महिला भल्या पहाटे नदीवर जात. मट्यारं धुवायचं असलं तर नदीवर जात. अशी ही पारंपरिक नदी गावातलं सगळं भलं भुरं आपल्या पोटात घेत काठावर वस्ती करून गाव वसलेल्या लोकांना स्वच्‍छ ठेवीत असे. गावातल्या लोकांची तहान आयुष्यभर भागवत असे. आता अशा जीवंत नदीचे दृश्य गावात दिसून येत नाही.
     नद्यांच्या आजच्या वाळवंट होण्याला आपणच कारणीभूत आहोत. नदी उगमाजवळचे डोंगर, झाडं तोडून आपण उघडे नागडे केले. नदीकाठचे झाडं तोडून आपण नदीला उघडं पाडलं. (त्याचा पावसावरही परिणाम झाला.) अतोनात पाणी उपसून वा अडवून नदीचं प्रवाहीपण बंद केलं. अतोनात वाळू उपसून नदीचं खड्डं केलं. नको तिथं अतिक्रमण करून छोट्या नद्या नामशेष केल्या. गावातल्या गटारी नदीत सोडल्या. रासायनिक कारखाण्यांचे प्रदुषित पाणी नदीत सोडलं. इतकं सारं होऊनही नद्या जिवंत राहतील कशा?
     (‘वाघूर’ 2018 च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाचा अतिसंक्षिप्त भाग.
या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  – डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
द्वारा पोस्ट केलेले डॉ. सुधीर राजाराम देवरे येथे ६:४४ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

ब्लॉग संग्रहण

  • ►  2025 (6)
    • ►  जून (1)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (1)
    • ►  फेब्रुवारी (1)
    • ►  जानेवारी (1)
  • ►  2024 (12)
    • ►  डिसेंबर (1)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (1)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (1)
    • ►  फेब्रुवारी (1)
    • ►  जानेवारी (1)
  • ►  2023 (11)
    • ►  डिसेंबर (1)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (1)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (1)
    • ►  जानेवारी (1)
  • ►  2022 (16)
    • ►  डिसेंबर (1)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (1)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
    • ►  जानेवारी (2)
  • ►  2021 (24)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (2)
    • ►  ऑक्टोबर (2)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (1)
    • ►  मे (3)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
    • ►  जानेवारी (2)
  • ►  2020 (24)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (2)
    • ►  ऑक्टोबर (2)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (2)
    • ►  मे (2)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
    • ►  जानेवारी (2)
  • ►  2019 (23)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (2)
    • ►  ऑक्टोबर (2)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (2)
    • ►  मे (2)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (1)
    • ►  जानेवारी (2)
  • ▼  2018 (24)
    • ▼  डिसेंबर (2)
      • गावाची रचना
      • लक्ष्मी येण्याची वेळ
    • ►  नोव्हेंबर (2)
      • नदी आणि गाव
    • ►  ऑक्टोबर (2)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (2)
    • ►  मे (3)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
    • ►  जानेवारी (2)
  • ►  2017 (23)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (2)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  सप्टेंबर (3)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (2)
    • ►  मे (2)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
    • ►  जानेवारी (2)
  • ►  2016 (25)
    • ►  डिसेंबर (3)
    • ►  नोव्हेंबर (3)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (2)
    • ►  मे (2)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
    • ►  जानेवारी (2)
  • ►  2015 (25)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (2)
    • ►  ऑक्टोबर (2)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (2)
    • ►  जुलै (2)
    • ►  जून (2)
    • ►  मे (2)
    • ►  एप्रिल (3)
    • ►  मार्च (2)
    • ►  फेब्रुवारी (2)
    • ►  जानेवारी (2)
  • ►  2014 (35)
    • ►  डिसेंबर (1)
    • ►  नोव्हेंबर (3)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (3)
    • ►  जुलै (1)
    • ►  जून (2)
    • ►  मे (5)
    • ►  एप्रिल (4)
    • ►  मार्च (5)
    • ►  फेब्रुवारी (4)
    • ►  जानेवारी (4)
  • ►  2013 (52)
    • ►  डिसेंबर (4)
    • ►  नोव्हेंबर (5)
    • ►  ऑक्टोबर (4)
    • ►  सप्टेंबर (4)
    • ►  ऑगस्ट (5)
    • ►  जुलै (4)
    • ►  जून (5)
    • ►  मे (4)
    • ►  एप्रिल (4)
    • ►  मार्च (5)
    • ►  फेब्रुवारी (4)
    • ►  जानेवारी (4)
  • ►  2012 (39)
    • ►  डिसेंबर (5)
    • ►  नोव्हेंबर (4)
    • ►  ऑक्टोबर (5)
    • ►  सप्टेंबर (4)
    • ►  ऑगस्ट (4)
    • ►  जुलै (4)
    • ►  जून (5)
    • ►  मे (6)
    • ►  एप्रिल (2)

माझ्याबद्दल

माझा फोटो
डॉ. सुधीर राजाराम देवरे
डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मयाचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, 'ढोल' व 'संपृक्त लिखाण' या नियतकालिकांचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश, २. आदिम तालनं संगीत, ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय, ४. पंख गळून गेले तरी, 5. अहिराणी लोकपरंपरा, 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने, (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2015) 7. अहिराणी लोकसंस्कृती 8. अहिराणी गोत 9. अहिराणी वट्टा 10. माणूस जेव्हा देव होतो 11. सहज उडत राहिलो, 12. सांस्कृतिक भारत, 13. माणसं मरायची रांग, 14. मी गोष्टीत मावत नाही, 15. टिंब, 16. आस्वाद : भावलेल्या कवितांचा, 17. ब्लॉगच्या जाळ्यातून जग, 18. Melodies with a Primitive Rhythm 19. आदिम तालाचं संगीत, 20. सोन्याची शाळा, 21. भंग अभंग, 22. फुटूच लागतात पंख, २३. अहिराणी : भाषा, परंपरा आणि संस्कृती, 24. भाषा : व्याप्ती आणि गंड, 25. सायकोचा तिढा, 26. गावदवंडी, 27. डोंगरदेव : अनुभूतीतून अभ्यास, 28. माणूसपणाच्या आसपास, 29. साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा, असे एकूण 32 पुस्तके. भ्रमणध्वनी: 7588618857
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
वॉटरमार्क थीम. Blogger द्वारे प्रायोजित.